अशोक कारके, औरंगाबादगतवर्षीच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील साखर कारखान्यांनी यंदा हंगामाच्या पहिल्याच महिन्यात तुलनेने चालू वर्षात दुप्पट उसाचे गाळप केले आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन पहिल्याच महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. गेली दोन-तीन वर्षे बंद असलेले साखर कारखाने यंदा सुरू करण्यात आले आहेत. ऊस कमी असतानाही यंदा विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक संचालकांनी साखर कारखाने सुरू केले होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही प्रमाणात नक्कीच होत आहे. २०१३-१४ मध्ये औरंगाबाद विभागात १५ कारखाने सुरू होते. त्यांनी पहिल्या महिन्यात ८५ लाख ४ हजार ९९३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. त्यातून ६ लाख ८० हजार ९७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा विभागात १९ कारखाने सुरू आहेत. त्यांनी पहिल्याच महिन्यात (९ डिसेंबरपर्यंत) १५ लाख ५५ हजार ५१६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १३ लाख ९ हजार ४८५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यंदा कारखान्याची संख्या वाढल्यामुळे पहिल्या महिन्यात उसाच्या गाळपाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांना जवळचा कारखाना बंद असल्यामुळे शेजारील जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस घातला होता. त्यामध्ये काही कारखान्यांनी ऊस उचलण्यास अधिक वेळ लावल्यामुळे उसाचे वजन घटले आणि त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता.
महिन्यात साखरेचे उत्पादन दुप्पट
By admin | Updated: December 15, 2014 00:48 IST