तेर : येथील तेरणा मध्यम प्रकल्पातून राजरोसपणे मृत साठ्यातून अवैैधरित्या पाण्याचा उपसा केला जात होता़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच जागे झालेल्या पथकाने प्रकल्पाच्या क्षेत्रात कारवाईसाठी सोमवारी दुपारी धाव घेतली़ मात्र, पथक येणार असल्याची कुणकुण लागल्याने अनेकांनी मोटारी काढून घेतल्याने या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले़ उस्मानाबाद तालुक्यातील तेर नजीकच्या तेरणा मध्यम प्रकल्पातून तेरसह ढोकी, तडवळा, येडशी या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो़ शिवाय उस्मानाबाद शहरालाही येथूनच पाण्याचा पुरवठा केला जातो़ मात्र, यंदा अपुरा पाऊस झाल्याने या प्रकल्पात मृतपाणीसाठा आहे़ सध्या चार गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो़ जिल्ह्यात सर्वत्र तीव्र पाणी टंचाई असल्याने उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या अनुषंगाने प्रशासनाकडून पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईसुद्धा होत आहे. मात्र, काही बडे शेतकरी तेरणा प्रकल्पातून राजरोसपणे पाणी उपसा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने रविवारी सचित्रवृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेवून नायब तहसीलदार एस.एस. रामदास, मंडळ अधिकारी बी.बी. राऊत, तलाठी पी.एन. थोरात, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आय. पी. बांगर आदींच्या पथकाने सोमवारी सायंकाळी जवळपास दोन तास धरण क्षेत्रात फिरुन अवैधरित्या पाणी उपसणाऱ्या मोटारींची पाहणी केली. मात्र, कारवाई होणार असल्याची खबर अगोदरच लागल्याने प्रशासनाच्या हाती काहीच लागले नाही.पथकाला धरणाच्या मध्यभागी दहा मिटरहून अधिक पीव्हीसी पाईपलाईन दिसून आले़ त्यानंतर मंडळ अधिकारी बी.बी. राऊत यांनी पाण्यात पोहत जावून मोटारी आहेत की नाही याची खात्री केली. मात्र, केवळ पाईपलाईनच दिसून आली. यावेळी पंचनामा करुन यासंदर्भात पाटबंधारे विभागाला खुलासा मागितला आहे. (वार्ताहर)
कारवाईसाठी धडकलेले पथक रिकाम्या हाताने परतले
By admin | Updated: November 18, 2015 00:40 IST