कडा: आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने ग्राहकांची तारांबळ होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आल्यापावली परत जाण्याची वेळ येत आहे. येथील राष्ट्रीयकृत बँकेतही ग्राहकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात सध्या पीक कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, जनधन योजना यासारख्या अनेक कामांसाठी शेतकरी, ग्राहक मोठ्या संख्येने बँकेत येतात. मात्र व्यवस्थापकच नसल्याने अनेक कामे खोळंबत आहेत. तर येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांवरही अंकुश न राहिल्याने ग्राहकांना आरेरावीची भाषा ऐकून घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँकेत कामापेक्षा तक्रारीच अधिक होत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या प्रश्नाकडे अद्यापर्यंत कोणीच लक्ष दिलेले नाही. पीक कर्जाच्या विविध फाईलसाठी शेतकऱ्यांची बँकेत ये- जा असते.मात्र कर्जाची पुर्तता न होता केवळ शेतकऱ्यांची पायपीटच होत आहे. शेतकऱ्यांची होणारी तारांबळ व आर्थिक भूर्दंड सहन करण्याची वेळ केवळ बँकेला मॅनेजर नसल्याने आली आहे. त्यामुळे हा प्रश्न त्वरित सोडवावा व ग्राहकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी जि.प. सदस्य रवी ढोबळे यांनी केली आहे. बँकेला त्वरित मॅनेजर मिळाला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन बँकेला छावा संघटनेच्या वतीने कुलूप ठोकणार असल्याचे तालुकाध्यक्ष अशोक वाघुले यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून मॅनेजर नसल्याने शैक्षणिक कर्जाची प्रकरणेही निकाली निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. (वार्ताहर)गेल्या तीन महिन्यांपासून येथील स्टेट बँकेच्या शाखेत व्यवस्थापकपदी कोणी नसल्याने बँकेचा कारभार हा प्रभारी व्यवस्थापक यांच्यावरच चालत आहे. वरिष्ठांकडून अद्यापर्यंत कोणतेही लेखी आदेश देण्यात आले नाहीत. सध्या तोंडी आदेशान्वयेच काम पाहत असल्याचे प्रभारी व्यवस्थापक बबन पाचपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
व्यवस्थापकाविना स्टेट बँकेचा कारभार
By admin | Updated: December 5, 2014 00:54 IST