औरंगाबाद : दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळातर्फे ११ ते २२ नोव्हेंबरदरम्यान पुणे, अकोला, नागपूर, अमरावतीसह विविध मार्गांवर रोज ५० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
दिवाळीनिमित्त प्रवाशांची बसस्थानकांत गर्दी होण्याची शक्यता आहे. संभाव्य घेऊन ‘एसटी’च्या रोज जादा बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे. औरंगाबादहून पुणे, अकोला, नागपूर, अमरावतीसह विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार आहे. शिक्षण, नोकरीनिमित्त औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना औरंगाबादला येण्यासाठी पुणे येथे जादा बसेस रवाना करण्यात येत असल्याचे अरुण सिया यांनी सांगितले. मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतून नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी औरंगाबाद राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीसाठी गावी जाण्यास प्राधान्य दिले जाते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.