धारुर: धारुर शहराला पाणीपुरवठा करणार्या धनेगाव येथील धरण कोरडे पडल्यामुळे एक महिन्यापासून पाणीपुरवठा नळ योजना बंद आहे. शहरवासियांचे पाण्यासाठी हाल होत असताना धारुर न.प.ने तांदळवाडी तलावावरुन तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या कामाला गती दिली आहे. या योजनेसाठी २७ लक्ष रुपयांचा निधी मिळाला होता. याचे पाणी लवकरच धारुर शहराला मिळणार आहे. ऐन वेळेला पाण्याचे संकट शहरवासियांवर ओढवले असताना नगराध्यक्षा सविता शिनगारे यांनी तांदळवाडीच्या तलावातून तात्पुरती योजना सुरू करुन ही तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेसाठी २७ लक्ष रुपयांचा निधी खर्च होणार आहे. धनेगावचे धरण कोरडे पडले असताना शहरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहरवासियांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली होती. मात्र नगराध्यक्षा शिनगारे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन तांदळवाडीच्या तलावातून तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात केली आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून, अवघ्या आठवडाभरात या तलावाचे पाणी धारुर शहरवासियांना पिण्यास मिळणार आहे. धारुर, केजसह बारा खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी धनेगाव धरणावरुन २५ वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजना करण्यात आली. मात्र यावर्षी हे धरण कोरडे पडल्याने एक महिन्यापासून नळ योजनेला पाणी आले नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली होती. धारुर शहरातील नागरिकांना पाणी टंचाई भासू नये म्हणून धारुर नगर परिषदेने उपाययोजना करुन शहरापासून ४ कि.मी. अंतरावर असणार्या तांदळवाडी तलावावरुन तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू केली. तांदळवाडीच्या तलावातील मुबलक पाणीपुरवठा लक्षात घेऊन या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. अवघ्या आठवडाभरात हे काम पूर्ण असून, या तलावातील पाणी धारुर शहरातील नागरिकांनी पिण्यासाठी उपलब्ध करुन, असा विश्वास नगराध्यक्षा शिनगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. तांदळवाडीतून धारुरला पाणी आणल्यानंतर शहरात चार दिवसाच्या आत कसे पाणी पुरविले जाईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच या पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती दिली असून, लवकरच काम पूर्ण करू, असे नगराध्यक्षा म्हणाल्या. (वार्ताहर)
पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती
By admin | Updated: May 22, 2014 00:10 IST