औरंगाबाद : शाहनूरमिया दर्गा परिसरातील अपेक्स परिजात सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे विकास शुल्क, मालमत्ता, पाणीपट्टीचे पैसे शंभर टक्के भरल्यानंतरही काही दिवसांपासून पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खासगी टँकरने गरज भागवावी लागत आहे. शंभूनगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने अनधिकृत नळ घेतले आहेत. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना पाणी मिळत नाही. दिवाळीपूर्वी पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
उद्यापासून पाच दिवस पाणीपुरवठा कर्मचारी रस्त्यावर
औरंगाबाद : दिवाळीत नागरिकांना नियोजित दिवशीच पाणी मिळावे यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. शहरात कुठेही जलवाहिनी फुटणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. नक्षत्रवाडी ते जायकवाडीपर्यंत काही कर्मचारी पेट्रोलिंगसाठी नेमण्यात येणार आहेत. बुधवारपासून हे कर्मचारी शिफ्टनुसार काम करणार आहेत. जलवाहिनी फुटल्यास त्वरित माहिती देणे आणि युद्धपातळीवर कामाला सुरुवात करणे, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
बाजारपेठेतील कचरा दोन वेळा जमा करणाार
औरंगाबाद : दिवाळीत खरेदीसाठी बाजारपेठेत अलोट गर्दी होत आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर येत आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने बाजारपेठेतील कचरा दोन वेळेस उचलण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी अतिरिक्त ३५ रिक्षा नेमण्यात आल्या आहेत. दिवसभरात एकदाही कचरा उचलण्यासाठी वाहन न आल्यास नागरिकांनी घनकचरा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.