लालखाँ पठाण, गंगापूर उत्तरेला शिवना, दक्षिणेला गोदावरी या नद्यांसह दोन मोठे प्रकल्प असूनही गंगापूर तालुका आतापर्यंत कोरडाच राहिला आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पोटचार्यांचे काम अद्याप अपूर्ण असल्याने तालुका सिंचनाच्या बाबतीत पिछाडीवर असून शेतकर्यांच्या बांधावर पाणी पोहोचलेलेच नाही. तालुका भौगोलिकदृष्ट्या पाण्याने संपन्न असला तरी या पाण्याचा पुरेपूर फायदा घेण्यास केवळ नेतृत्वाअभावी कमी पडला आहे. माजी खा. दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांचा अपवाद वगळता पाण्यासंदर्भात एकही पुढारी तालुक्याला न्याय देऊ शकला नाही. डोणगावकरांनी त्यांच्या काळात गंगापूर सह. साखर कारखान्याच्या माध्यमातून गोदावरी नदीवर ९ ठिकाणी लिप्ट इरिगेशन सुरू करून शेतकर्यांना सिंचनासाठी त्या पाण्याचा फायदा करून दिला होता; मात्र त्या नंतरच्या काळात सुरू असलेल्या योजना एकामागून एक बंद पडल्या व शेती सिंचनाचा प्रश्न उपस्थित झाला. गेल्या दोन-तीन वर्षात जेमतेम पाऊस झाल्यामुळे परिसरातील मध्यम प्रकल्प, पाझर तलाव कोरडेच राहिले. यावर्षी नांदूर-मधम्ोश्वर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले; मात्र पाण्याचा गंगापूर तालुक्यातील शेतकर्यांना फायदा झाला नाही. टँकर लॉबीचे चांगभले गंगापूर तालुक्यात शेती सिंचनाची तर वाट लागलीय. शिवाय ग्रामीण भागातील अनेक गाव, वाड्या, वस्त्या, तांडे येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करीत आहेत. पिण्याच्या पाण्यावर शासनाची लाखो रुपयांची उधळपट्टी नावालाच असून टँकर लॉबी आपले चांगभले करून घेत आहे. निसर्गाने या तालुक्यास भरभरून दिलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या तालुक्यात उपजतच पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. यात गोदावरी नदीचा ३५ कि.मी. पाण्याचा जिवंत जलसाठा, तर शिवना नदी तालुक्याच्या मधोमध आहे. तालुक्याच्या पूर्वेला बारा महिने वाहणारी खांब नदी, त्याचबरोबर पावसाचा पाणी साठा करण्यासाठी तीन मध्यम प्रकल्प असा नैसर्गिकरीत्या पाण्याचा ओघ या तालुक्यात आहे. त्याचबरोबर नांदूर-मधमेश्वर कालव्यामुळे हक्काचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. केवळ प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज घडीला पाण्याचे स्रोत आहेत; परंतु प्रशासन व राज्यकर्त्यांची मानसिकता ही संकुचित झाल्याचे चित्र असल्यानेच या बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या नाहीत. सद्य:स्थितीला अनेक योजना आहे त्याच स्थितीतच आहेत, तर काही ठिकाणी मात्र येथील यंत्रणा लांबविल्या आहेत. या संस्था आजही सुरू होऊ शकतात. सदरच्या योजना सुरू झाल्यास तालुक्यात कुठेच नवी योजना राबविण्याची गरज भासणार नाही. तालुक्याची ही परिस्थिती पाहून विद्यमान राजकीय नेतृत्व आणि प्रशासन भविष्यात तरी उपाययोजना करणार काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी १९८३ ते १९८५ दरम्यानच्या कालावधीमध्ये साहेबराव पाटील डोणगावकर यांनी या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा भविष्यात संभाव्य टंचाई भासणार नाही या दृष्टीने गोदावरी काठावरील गावातून लिप्ट इरिगेशनची निर्मिती करून सुमारे २० हजार एकर शेती ओलिताखाली आणली होती. यासाठी गोदाकाठावरील मांगेगाव, भिवधानोरा, गळनिंब, बगडी, ममदापूर, अंमळनेर, तळपिंप्री, शंकरपूर, बोरुडी, नवाबपूर, सिद्धपूर, भेंडाळा आदी ठिकाणी प्रत्यक्षात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून स्वतंत्र सहकारी संस्था अधिनियम १९६७ प्रमाणे परिसरातील शेतकर्यांना सभासद करून फेडरेशन तयार केले. यातूनच पाणीपुरवठा योजनेचा कारभार सुरू होता. दरम्यानच्या काळात गंगापूर साखर कारखान्याला राजकीय ग्रहण लागून या अत्यंत दूरदृष्टी ठेवून निर्माण केलेल्या पाणीपुरवठा योजनेसही घरघर लागली. वर्ष-दोन वर्षाच्या कालावधीत या संस्था एकापाठोपाठ बंद पडून भविष्यातील हरित क्रांतीचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. कारखानाही बंद आहे.
सिंचनात गंगापूर पिछाडीवर
By admin | Updated: May 22, 2014 00:55 IST