औरंगाबाद : मोदी लाटेवर यशस्वीरीत्या स्वार होत चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचा औरंगाबाद बालेकिल्ला अबाधितच राखला असे नव्हेतर, गेल्या तिन्ही वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्य घेऊन जबरदस्त चौकारही ठोकला. महायुती व काँग्रेस आघाडीमध्ये औरंगाबादेतील लढत तुल्यबळ होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा फोल ठरवत खैरे यांनी दणदणीत विजय मिळविला. खैरे यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच प्रचाराला सुरुवात केली होती. नियोजनबद्ध व शिस्तबद्ध प्रचारासह प्रचार यंत्रणा सतत गतिमान ठेवली. विशेषत: गंगापूर, कन्नड व वैजापूर या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले होते. कन्नडवर लक्ष ठेवण्यासाठी पुत्र ऋषिकेश, वैजापूरसाठी पत्नी वैजयंती खैरे आणि गंगापूरवर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना खास नेमले होते. तिन्ही विधानसभा मतदारसंघांनी त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. पाटील यांना त्यांच्या कन्नडमधूनही मताधिक्य मिळू शकले नाही, यातच सर्व आले. शिवसेनेतील अंतर्गत असंतोष, भाजपाचा असहकार आणि मतदारसंघाचा विकास करण्यात खैरे अपयशी ठरल्यामुळे मतदारांची नाराजी शिगेला पोहोचलेली होती. त्याचे पडसाद उद्धव ठाकरे यांच्या शहरातील सभेत उमटले. सभेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे मात्र, खैरे यांनी झटपट चक्रे हलविली. मुंबईहून स्थानीय लोकाधिकार समितीला पाचारण केले. प्रचाराची यंत्रणा नव्याने आखली. पक्षांतर्गत रुसवे फुगवे दूर करून मतदारांना अंतिम टप्प्यात आपल्या बाजूने कुशलतेने वळविण्यात ते यशस्वी ठरले. याशिवाय रिपब्लिकन नेते व कार्यकर्त्यांना दलित वसाहतींमधून नियोजनबद्ध पद्धतीने फिरविले. हे सर्व घडत असताना मोदीबद्दल मतदारांत वाढलेले आकर्षण खैरे यांनी ‘कॅश’ न केले असते तरच नवल. त्यासाठी खैरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्वतंत्र होर्डिंग्ज उभारून भाजपासह मतदारांची मने आपल्या बाजूने वळती केली. काँग्रेसचे नितीन पाटील यांनीही उमेदवारी अर्ज सादर करताना मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. ‘व्हिसपर कॅपेंनिंग’ मध्ये पाटील यांनी सुरुवातीला आघाडी घेत, खैरे यांच्यावर मानसिक दडपण वाढविले होते. परंतु हे दडपण पाटील यांना शेवटपर्यंत टिकविता आले नाही. पाटील यांच्या कल्पनेतील मुस्लिम, मराठा व दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा फॅक्टर मूर्त स्वरूप घेऊ शकला नाही. खैरे यांची विजयाची परंपरा चौथ्या वेळेस रोखण्याचे काँग्रेस आघाडीचे मनसुबे मोदी लाटेने धुवून नेले. जिंकल्याचे कारण खैरे यांच्याविरुद्ध मतदारांत ‘अॅन्टिइन्कबन्सी’ होतीच; परंतु मोदी नावाच्या त्सुनामीचा त्यांनी खुबीने वापर करून घेतला. हरल्याचे कारण प्रचाराची अपुरी यंत्रणा, कार्यकर्त्यांचा अभाव. वैयक्तिक जनसंपर्काचा अभाव. मतदारसंघ पिंजून काढण्यात आलेले अपयश. या कारणांमुळे मिळाला विजय 1 खैरे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे मतदारसंघातील फीडबॅक मिळत गेला. त्यानुसार नियोजनात अनुरूप बदल करून प्रचार यंत्रणा गतिमानपणे राबविणे त्यांना शक्य झाले. 2 सेनेत कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. सोबत महायुतीत आलेल्या रिपाइं कार्यकर्त्यांवर योग्य कामे सोपवून ती त्यांनी करवूनही घेतली.
शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य
By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST