कन्नड : अतिवृष्टीमुळे खरिपाची वाट लागल्याने हैराण झालेला शेतकरी आता कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त झाला आहे. या संकटातून सावरून कशीबशी रबीची पेरणी केली. मात्र, ढगाळ वातावरणामुळे गारपीट होण्याच्या भीतीने शेतकरी पुन्हा चिंतातूर झाला आहे.
तालुक्यात वार्षिक सरासरीच्या दीडपट पाऊस पडला. या पावसामुळे मृग नक्षत्रात पेरणी होवूनही मूग, उडीद यांना कोंब फुटले. मकाची कणसे शेतातील पाण्यावर तरंगल्याने खराब झाली. तर कपाशीच्या बोंडे सडल्याने खरिपाची वाट लागली. पाऊस उघडल्यानंतर कपाशीची परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना बोंडअळीने पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केले. चार ते पाच वेचणी होणाऱ्या कपाशीने दोन वेचणीत आटोपते घेतले. झालेल्या नुकसानीची शासकीय मदत पदरात पडली नाही. तोच रबीच्या पिकावरही संकट घोंगावू लागले. आकाशात पुन्हा ढग येत आहेत. त्यामुळे एकतर अवकाळी किंवा गारपीट होण्याची शेतकऱ्यांना भीती वाटू लागली आहे.
आधीच खरिपाची वाट लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा रबीकडे आहेत. मात्र, ढगाळ वातावरणाने शेतकरी पुन्हा धास्तावला आहे.