वाशी : दुष्काळ व अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा नापिकीमुळे दिवाळीचा सणही साजरा करता आला नाही. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी, अतिवृष्टीच्या नुकसानीसह विम्याची रक्कम व भरपाई तात्काळ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ नोंव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर ‘चटणी-भाकर खाओ’ आंदोलन करण्यात आले. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडले नाही. उलट शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने चालू वर्षातील मंजूर पीक विमा तात्काळ वाटप करावा, केंद्र सरकारने मंजूर केलेली नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भपाई द्यावी, भिमाशंकर साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांची एफ.आर.पी.ची रक्कम मिळावी, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, कांदा चाळीचे अनुदान वाटप करावे, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
बघावं तेथे कचऱ्याचा खच
By admin | Updated: November 2, 2016 00:26 IST