बीड: जिल्ह्यातील खरीप पिकाच्या नुकसानीच्या भरपाईचा दुसरा हप्ता उपलब्ध झाला आहे. तब्बल १४२ कोटी ६२ लाख ३३ हजार रूपये तहसीलदारांकडे वर्ग केले असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होत असल्याने यंदाच्या खरीप पिकाने बळीराजाला धोका दिला. या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून पहिला हप्ता ९ जानेवारी दरम्यानच तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला होता. मंगळवारी खरीप पिकांचे अनुदानही ज्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. नुकसानभरपाई बँकेत जमा झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकामध्ये उघडलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. काही बँकाकडून कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते यांनी केला. तातडीने भरपाई द्यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)शासनाकडून खरीप पिकाच्या नुकसानीचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडून संबंधीत तहसीलदारांकडे वर्ग झाल्यानंतर विविध बँकांमार्फत वितरण करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र ठिकठिकाणच्या बँकाच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. यातही काही राष्ट्रीयकृत बँकाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण सांगितले जात आहे. तर काही बँकाचा दृष्टीकोण नकारात्मक असल्याचेही पहावयास मिळत आहे. याचा त्रास शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत असल्याचे लाभार्थी शेतकऱ्यांंचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांकडे अनुदान वाटपाचे काम दिलेले आहे तर काही तालुक्यांमध्ये जिल्हा बँकेकडे खरीपाच्या नुकसानीचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे. काही बँकांकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना खाते उघडण्यासाठी तासन-तास बँकेच्या दारात रांगेमध्ये उभे रहावे लागत आहे.
खरिपाच्या नुकसानीचा दुसरा हप्ता वर्ग
By admin | Updated: February 11, 2015 00:27 IST