औरंगाबाद : शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी बुधवारी ‘भाजपचे केंद्रातील मोदी सरकार म्हणजे निजामाच्या बापाचे सरकार आहे,’ अशा तिखट शब्दात टीका केली. त्याला चोवीस तास उलटण्याच्या आत सेनेने ‘यू- टर्न घेतला. देवेंद्र फडणवीस हे तर दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात सेना नेते तथा औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी भाजपावर स्तुतिसुमने उधळली. त्यावरून ‘एकाने झोडपायचे अन् सत्तेसाठी दुसऱ्याने गोंजारायचे’ असा सेनेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा पाहावयाला मिळाला.खा. राऊत यांनी बुधवारी औरंगाबादेत सेनेच्या मेळाव्यात केंद्र सरकारवर जहरी टीका केली होती. त्यांनी मोदींना लक्ष्य करीत केंद्र सरकारची तुलना निजाम राजवटीशी केली होती. त्यावरून दिवसभर ‘युती’त चांगलीच जुगलबंदी रंगली होती. गुरुवारी औरंगाबादेत पालकमंत्री रामदास कदमांनी भाजपच्या या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, खा.राऊत हे काय बोलले हे मला माहिती नाही. ते केंद्रात असतात, तिकडे काय चालले आहे, मला माहिती नाही, याबाबत तुम्हीच त्यांना विचारा. ते केंद्राच्या बाबतीत बोलले, राज्य सरकारच्या बाबत बोलले नाही. राज्यातील परिस्थिती मला माहिती आहे. मला जे बोलावेसे वाटले, ते मी बोललो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करीत आहे. फडणवीस आणि ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे समांतर कामकाज सुरू आहे. राज्यात फडणवीस सरकार अत्यंत चांगले काम करीत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी अधिकारी एस.जी.पडवळ यांनी केले. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, सभापती मोहन मेघावाले, जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे, सीईओ डॉ.अभिजित चौधरी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी उपस्थित होते.हरिभाऊ बागडे- रामदास कदमांची जुगलबंदीजिल्ह्यातील १२०० शेतकऱ्यांना जिल्हा कृषी विभागातर्फे मोफत बियाणांच्या वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री कदम यांच्या हस्ते सिडको नाट्यगृहात पार पडला. सिल्लोड, सोयगाव, कन्नडमधील शेतकऱ्यांना एकरी एक बॅग बियाणे देण्यात आले. यात मका वाणाच्या, तर उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना मका, कापूस बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष बागडे यांना उद्देशून कदम म्हणाले, बागडे साहेब, मराठवाड्यात शिवसेनेने १०० पोेकलेन जलयुक्त शिवारासाठी दिले. ५५ टँकर दिले, पाण्याच्या टाक्या दिल्या. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या कार्यक्रमात शिवसेनेला सौम्य असा चिमटा काढला. १३७२ खेडे जिल्ह्यात आहेत. बियाणे वाटपासाठी फक्त १२०० शेतकरी काढण्यात आले. एका गावात एकच शेतकरी गरिबीच्या संकटात आहे काय? असा सवाल त्यांनी केला.
संजय राऊतांनी झापले; कदमांनी गोंजारले...
By admin | Updated: June 9, 2016 23:53 IST