औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील तळपिंप्री येथे ग्रुपग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असले तरी संबंधितांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.तळपिंप्री येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी दि. २२ एप्रिल २०१२ रोजी अण्णासाहेब भानुदास निकम यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर सीईओंनी गंगापूरचे गटविकास अधिकारी, जि.प. बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना याप्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते; चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर सदर कामात गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सीईओंनी कडक कारवाई करून मला अहवाल सादर करावा, असा आदेश काढला. असे असले तरी आजपर्यंत या प्रकरणी कुठलीच कारवाई झालेली नाही, असे तक्रारदार अण्णासाहेब निकम यांचे म्हणणे आहे. त्यांनी दि. ३ जुलै २०१४ रोजी पुन्हा सीईओंना पत्र पाठवून आपल्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे कळविले आहे.गंगापूर येथील संबंधित अधिकारी, अभियंता व कर्मचारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून ते सीईओंच्या आदेशालाही मानत नाहीत, असे निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तळपिंप्री येथील रोहयो कामात भ्रष्टाचार
By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST