राजकुमार जोंधळे , लातूरशहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून, चौका-चौकात प्रवासी वाहतुकीसाठी बेशिस्त आॅटोचालकांमध्ये चढाओढ सुरु आहे. परिणामी, या आॅटोवाल्यांनी शहरातील चौक आणि रस्ते कसे अडविले आहे, हे ‘लोकमत’ने शुक्रवारी दुपारी १२.३० ते ३.३० या कालावधीत केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’च्या माध्यमातून पुढे आले आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक बेशिस्त आॅटोवाल्यांनी काबिज केल्याचे चित्र ‘लोकमत’च्या कॅमेऱ्याने टिपले आहे. याकडे वाहतूक शाखेचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.दुपारी १२.३० वाजता उषाकिरण थिएटरसमोरील वाहतूकीवर लोकमतचा कॅमेरा फिरविला असता, येथेही बेशिस्त आॅटोचालकांच्या प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे दिसून आले. केवळ एकमेकांना ओव्हरटेक करत प्रवासी मिळविण्यासाठी वातुकीची शिस्त मोडण्यात अनेक आॅटोचालक आघाडीवर होते. पुढे शिवाजी चौकात १२.४५ वाजता वाहतूक शाखेच्या पोलिसांदिक्कत वाहतुकीचे नियम मोडीत काढत आॅटोवाल्यांची प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे चित्र लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झाले.विशेष म्हणजे, वाहतूक शाखेचे कर्मचारी हाकेच्या अंतरावर उभे होते. चौकात वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम मोडीत घुसाघुसी सुरु होती. याकडे या कर्मचाऱ्यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. पुढे गांधी चौकात १.०५ वाजता लोकमतचा कॅमेरा पोहचला. येथेही प्रवासी मिळविण्यासाठी एकमेकांना ओव्हरटेक करत आपले आॅटो थांबविल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. विशेष म्हणजे, येथे एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी उपस्थित नव्ुहता. प्रत्येक आॅटोचालक गांधी चौकात दोन्ही बाजुला तळ ठोकत असल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात टिपले गेले. मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशव्दारावर दुपारी १.२५ वाजता ‘लोकमत’चा कॅमेरा पोहचला. येथील बसस्थानकाचे तिनही प्रवेशव्दार बेशिस्त आॅटोवाल्यांनी काबिज केली होती. परिणामी, महामंडळाच्या बसचालकास ये-जा करताना कमालीची कसरत करावी लागत होती. बसस्थानकास या बेशिस्त आॅटोवाल्यांनी घेरल्याचे चित्र दिसून आले. हनुमान चौकात दुपारी १.४५ वाजता वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे आढळून आले. यामुळे बेशिस्त आॅटोचालकांचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. शहराचा मध्यवर्ती आणि व्यापारी भाग म्हणून गंजगोलाईचा समावेश आहे. शहरातून येणाऱ्या प्रत्येक आॅटोवाल्यांचा येथे वावर असतो. येथेही लोकमतचा कॅमेरा दुपारी २.०५ वाजता पोहोचला. वाहतूक पोलिसांना चकावा देत बेशिस्त आॅटोवाल्यांकडून प्रवासी मिळविण्यासाठी रस्ते अडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून आले. एकमेकांच्या समोर आॅटो आडवे लावणे, ‘ओव्हरटेक’ करत अचानक मध्येच थांबणे यामुळे पाठिमागून येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. यातून एकमेकांवर कुरघोडी करताना लहान-मोठे अपघातही होत असल्याचे चित्र दुपारी दिसून आले. येथेही वाहतूक शाखेच्या पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे दिसून आले. शहरातील पाच नंबर चौक, उषाकिरण थिएटर, शिवाजी चौक, रेणापूर नाका, राजीव गांधी चौक, आदर्श कॉलनी, मिनी मार्केट कॉर्नर, गांधी चौक, बसस्थानक परिसर, गुळ मार्केट परिसर, हनुमान चौक परिसर, सुभाष चौक परिसर आणि शाहू चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.गुळमार्केट चौक रामभरोसेगुळमार्केट चौकात दिवसभर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र लोकमतने आपल्या कॅमेऱ्यात दुपारी ३.१५ वाजता टिपले. विशेष म्हणजे, येथील सिग्नलही बंद असल्याचे दिसून आले. वाहतूक सुरळीत करणाऱ्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या ‘कोपरा’ संस्कृतीमुळे येथील वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून आले. दिवसभर कोपऱ्यात ‘दबा’ धरुन बसणाऱ्या कर्मचाऱ्यामुळे बेशिस्त आॅटोवाल्याचे फावते आहे. दुचाकीवाल्यांना ‘हेरत’ कारवाईचा बडगा उगारणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बेशिस्त आॅटोचालकांकडे मात्र जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
बेशिस्त आॅटोवाल्यांनी अडविले रस्ते !
By admin | Updated: June 18, 2016 00:58 IST