औरंगाबाद : सुधारित विकास आराखड्यात काही ठिकाणी नागरी वसाहतींवर आरक्षणे पडली आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत गरीब जनतेवर अन्याय होणार नाही, अशी आरक्षणे बदलून ती दुसरीकडे पर्यायी जागेत टाकली जातील, असे महापौर त्र्यंबक तुपे यांनी शनिवारी जाहीर केले. महापौर तुपे यांनी शनिवारी जाधववाडी आणि परिसरातील काही वसाहतींची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील छत्रपतीनगर, पिसादेवी, मारोतीनगर, रामेश्वरनगर, मयूर पार्क, म्हसोबा मंदिर परिसर या भागांतील वसाहतींवर काही ठिकाणी वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत. त्याविषयी येथील नागरिकांनी महापौरांकडे तक्रार केली. आम्ही येथे २० ते २५ वर्षांपासून राहतो, या वसाहती जुन्या आहेत. त्यामुळे ही आरक्षणे उठविली गेली पाहिजेत, अशी मागणी या नागरिकांनी महापौरांकडे केली. यानंतर सायंकाळी महापौरांनी विकास आराखड्यातील आरक्षणामध्ये बदल केला जाणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, शहरात अनेक ठिकाणी नागरी वसाहतींवर आरक्षणे पडलेली आहेत. ते चुकीचे आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत गरीब जनतेवर अन्याय होणार नाही, जिथे जिथे असे आरक्षण असेल ते बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील. शक्य असेल तिथे अशी आरक्षणे काढून ती बाजूच्या मोकळ्या जमिनीवर टाकली जातील. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तसा निर्णय घेतला जाईल, असेही महापौर म्हणाले.
वसाहतींवरील आरक्षण उठवणार
By admin | Updated: January 3, 2016 00:01 IST