जालना: शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सहा वर्षांपूर्वीपासून तयार होत असलेला घनकचरा प्रकल्प अपूर्णच आहे. मात्र हा प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी आता जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी पुढाकार घेतला असून शासनाकडे याबाबतचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. २००८-०९ मध्ये पालिकेने सामनगाव परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्पाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. आजपर्यंत येथे संबंधित एजन्सीने ६४ लाख रुपयांची यंत्रणाही बसविली आहे. बाराव्या वित्त आयोगातील निधीतून इतर कामे करण्यात आली.परंतु सहा वर्षे उलटली तरी हा प्रकल्प सुरु झाला नाही. याउलट या प्रकल्पास प्रशासकीय मान्यताच नसल्याचा विषय समोर आला आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून निधी मिळावा म्हणून पालिका प्रयत्नशील असल्याचे पालिकेतील सूत्रांचे म्हणणे आहे.परंतु प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत या प्रकल्पासाठी निधी देखील मिळणार नाही. एकीकडे जालनेकरांसमोर अस्वच्छतेची मोठी समस्या निर्माण झालेली असताना शासनाकडून घनकचरा प्रकल्पास प्रशासकीय मान्यतेसाठी एवढा विलंब का लावला जात आहे, याविषयी नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे. हा प्रकल्प जैसे थेच असल्याने कचरा टाकण्यासाठी इतर ठिकाणीही जमीन संपादित करण्यात येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शहरातील वाढत्या कचऱ्यावर कायमस्वरुपी उपाय केव्हा होणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.स्वच्छता विभागाच्या म्हणण्यानुसार शहर कचरामुक्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी पालिकेकडून नियोजन करण्यात येते. नदीपात्र अथवा इतर ठिकाणी कचरा टाकण्यात येत नाही. कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने नागरिकांनीही सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, प्रकल्पाचे काम सुरु झाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्वच खर्चाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नायक यांनी दिले आहेत. कामाचे मूल्यांकन त्या काळातील यंत्रणेची चौकशी करुन जबाबदारी ठरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)कचऱ्यामुळे नागरिकांना त्रासदिवसाकाठी निघणाऱ्या तब्बल ८० टनपेक्षा अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावावी कोठे, असा मोठा पेच पालिकेसमोर आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहर कचरामय बनले असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून सहा वर्षांपासून लाखो रुपर्य खर्चून तयार होत असलेला घनकचरा प्रकल्प लाल फितीच्या कारभारात अडकला आहे.बुधवारी जिल्हाधिकारी नायक यांनी नगरपालिकेत विभागप्रमुखांची सात तासांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी नायक यांनी सामनगाव येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी तसेच जालना शहरातील कचरा डेपोलाही भेट देऊन तेथील पाहणी केली.
घनकचरा प्रकल्पाची लाल फितीतून सुटका
By admin | Updated: June 19, 2014 23:49 IST