बीड : केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. जिल्हा दुष्काळाने होरपळत असतानाच पशुधन वाचविणे कठीण झाले असल्याने चारा छावण्या सुरू करण्यासाठी आमदारांनी आपल्या मंत्र्याकडे मागणी करून त्यास मंजुरी आणणे अपेक्षित असतानाच बीड जिल्ह्याच्या भाजपच्या विद्यमान आमदारांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देऊन चारा छावण्या उभारण्याची मागणी केली असल्याची धक्कादायक आणि हास्यास्पद बाब समोर आली आहे.मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात चाऱ्याचा तुटवडा आहे. एवढेच नाहीतर लिंबाचा पाला टाकूण जनावरे जगवली जात आहेत. चाऱ्याची अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील भाजपच्या आमदारांनी चारा उपलब्धतेसाठी कुठलीच ठोस पावले उचलली नाहीत मात्र दोन दिवसापूर्वी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यात चारा टंचाई असल्याने छावण्या उभाराव्यात असा आग्रह मदत व पुनर्वसन मंत्र्याकडे धरल्यानंतर दोन महिने उशिराने का होईना बीडच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जाग आली असून गुरूवारी या सर्वांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांंना निवेदनही दिले.यावेळी आ. आर. टी. देशमुख, आ. भिमराव धोंडे, आ. अॅड. लक्ष्मण पवार यांची बैठकीला उपस्थिती होती. जिल्हयातील जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जून महिन्यापासून निर्माण झालेला आहे. असे असताना आजवर केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार शासन, प्रशासनाकडून झालेला आहे. यामुळे पशुमालाकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. चाऱ्या अभावी शेतकऱ्यांना कवडीमोल भावात आपली जणावरे विकावी लागली. काही शेतकऱ्यांनी तर फुकट जनावरे वाटली.असे असताना देखील आमदारांनी चारा उपलब्ध करण्याच्या दुष्टीकोणातून कुठलेच ठोस पावले उचलले नाहीत. जून महिन्यातच जिल्हयातला संपूर्ण चारा संपला होता. शेतकऱ्यांनी चारा नसल्याची ओरड करूनही दुर्लक्ष झाले होते. मात्र दोन महिने उशिराने का होईना बीड जिल्ह्यातील आमदारांना जाग आल्याने चाऱ्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा पशुमालकांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)गुरूवारी भाजप आमदारांनी जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून चारा टंचाई संदर्भात आढावा घेतला. शिवाय चारा, पाणी उपलब्धते बाबत आग्रह धरला. मात्र या बैठकीला केजच्या भाजप आमदार संगिता ठोंबरे यांची गैरहजेरी होती.राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. शिवाय पालकमंत्री पंकजा मुंडे असताना देखील भाजपच्या आमदारांना जिल्हयातील समस्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून छोट-छोट्या समस्यांच्या निवारणासाठी मागणी करावी लागत असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. त्यांच्या या कृत्याने भाजपच्या जुन्या काळाची आठवण यानिमित्ताने समोर आली आहे. त्यांची जुनी सवय गेली नाही असे यावरून सिध्द होते.
सत्ताधाऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Updated: August 7, 2015 01:16 IST