औरंगाबाद : आगामी निवडणूक आणि सणासुदीच्या काळात बाहेरच्या काही व्यक्ती येथे येऊन घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व घरमालक, हॉटेल, लॉजमालक आणि संस्थांनी त्यांच्याकडे असलेल्या भाडेकरूंविषयी तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवावे; अन्यथा मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी दिला आहे. अल्प काळासाठी वास्तव्यास येऊन काही व्यक्तींनी घातपात घडविल्याच्या घटना यापूर्वी मुंबई, पुणे या शहरांमध्ये घडलेल्या आहेत. सणासुदीच्या काळात, निवडणुकीच्या काळात बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील व्यक्ती येतात आणि घातपाती कृत्य करून परत निघून जातात, असे यापूर्वी अनेकदा उघडकीस आलेले आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि दसरा, दिवाळी सणातही असे कृत्य घडण्याची शक्यता औरंगाबादेत नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कुंभारे यांनी कळविले आहे. नागरिकांनी आपल्या घर, हॉटेल, लॉजमध्ये वास्तव्यासाठी येणाऱ्या भाडेकरूचे नाव, मूळ पत्ता, ओळखपत्र, मोबाईल क्रमांक घ्यावा, त्यानंतरच त्याला वास्तव्य करू द्यावे. शिवाय या भाडेकरूची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ कळवावी; अन्यथा संबंधित मालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक कुंभारे यांनी दिला आहे.
भाडेकरूंची माहिती कळवा; अन्यथा फौजदारी
By admin | Updated: September 17, 2014 01:08 IST