जालना : येथील बसस्थानकातील अस्वच्छतेबद्दल ‘लोकमत’ ने प्रकाशझोत टाकल्यानंतर एस.टी. महामंडळाची यंत्रणा खडबडून जागी झाली. मंगळवारी आगारप्रमुखांनी खाजगी कामगारांमार्फत स्वच्छता करवून घेतली. बुधवारी सकाळी विभाग नियंत्रक चेतना पाटील यांनी अचानक भेट देऊन स्वत: साफसफाई केली.गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’ च्या हॅलो जालना अंकातून बसस्थानकातील अस्वच्छतेचा मुद्दा मांडला जात आहे. या वृत्ताची दखल घेत विभाग नियंत्रक चेतना पाटील यांनी बुधवारी सकाळी १० वाजता अचानक स्थानकास भेट दिली. तेव्हा आगारातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पाटील यांनी आगारप्रमुखांच्या कार्यालयात न बसता, अगोदर मी आगाराची पाहणी करणार, असे सांगत स्थानिक अधिकाऱ्यांनाही सोबत घेतले. प्रवाशांना ज्या जलकुंभातील पाणी पिण्यासाठी दिले जाते, त्याची सफाई अनेक दिवसांपासून झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. आगार स्वच्छ ठेवा, प्रवाशांच्याही आरोग्याची येथे काळजी घ्या, असेही पाटील यांनी सांगितले. वाहक-चालकांच्या विशेषत: महिला वाहकांच्या आरामगृहाची पाहणी केली.विभाग नियंत्रकांनी अचानक भेट देऊन स्वत: स्वच्छता केल्याने तेथे उपस्थित प्रवाशांना त्याविषयीचे कुतूहल वाटले. मात्र ही मोहीम केवळ छायाचित्रांपुरतीच मर्यादित राहू नये, अशीही चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.४वाहक-चालकांना ज्या रांजणातील पाणी पिण्यासाठी देण्यात येते, ते रांजणही स्वच्छ ठेवावेत, अशी सूचना विभाग नियंत्रकांनी केली. स्वच्छतागृहांमध्ये महिला व लहान मुलांना दर आकारले जाऊ नयेत, असे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभाग नियंत्रकांनी दिला.
विभाग नियंत्रकांनीच केली साफसफाई..!
By admin | Updated: November 13, 2014 00:51 IST