संजय कुलकर्णी , जालनायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन ज्वारीची चाहूल लागली असून येत्या आठवडाभरात त्याची मोठ्या प्रमाणावर आवक होईल, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. गतवर्षीपेक्षा आवक कमी झाल्याने तुरीचे भाव वधारले आहेत. अपुऱ्या पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादन कमी झाले. त्याचा परिणाम म्हणून बाजारातील मालाची आवकही कमी झाली आहे. पांढरी आणि काळ्या जातीच्या तुरीचे दर ५५०१ रुपयांपर्यंत सारखेच असून लाल तूर ४८५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. ४९६ गव्हाचे दर १७६९ रुपयांपर्यंत तर लोकवन गहू १४६० ते १६०० रुपयांपर्यंत आहेत. शाळू ज्वारी १२०० ते २५००, बाजरी १०५० ते १६५० आणि मका १०५० ते ११६६ रुपयांपर्यंत आला आहे. सोयाबीनचा मागील वर्षी १० क्विंटलपर्यंत उतारा होता. मात्र यावर्षी सोयाबीनचे उत्पादनही कमी झाल्याने त्याचे दर ३२८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले. गावरान हरभरा २४०० ते ३२६५ रुपयांवर आहे. पिवळा गहू २२०० ते २५०० रुपये आणि लाल गुळ २०८० ते २१९० रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे. शुक्रवारी जालना बाजार समितीमध्ये सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव गणेशराव चौगुले यांनी दिली.जालना बाजार समितीच्या आवारात दुष्काळातही सीसीआयकडून कापसाच्या खरेदीमुळे गेल्या आठवड्यात २४ जानेवारी रोजी ७ कोटी २ लाख ४५ हजार रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. यामध्ये कापसाची खरेदी एकाच दिवशी १४ हजार ५६६ क्विंटल एवढी झाली. त्यापाठोपाठ तुरीची ५७ लाख ९१ हजार रुपये, सोयाबीन १९ लाख ९७ हजार तर ज्वारीची ९ लाख ५८ हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री झाली.