स. सो. खंडाळकर , औरंगाबादरोटेगाव- पुणतांबा रेल्वेमार्गाचे केवळ २५ कि.मी.चे काम एक दोन वर्षांपासून नाही, तर तब्बल १५ वर्षांपासून रखडले आहे. नव्या रेल्वेमंत्र्यांनी तरी यात लक्ष घालावे व हा प्रश्न मार्गी लावावा, अशी भावना अनेक साईभक्त व्यक्त करीत आहेत. २०१८ मध्ये शिर्डी संस्थान आपले शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. यानिमित्ताने देश- विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीला येणार आहेत. रोटेगाव- पुणतांबा हा मार्ग पूर्ण झाल्यास औरंगाबाद ते पुणे हे अंतर ९० कि.मी.ने कमी होणार आहे. शिवाय या मार्गामुळे शिर्डी, कोल्हापूर आणि गोवा ही तीन पर्यटनस्थळेही औरंगाबादशी जोडली जाणार आहेत. कारण मनमाडला न जाता पुणतांबा- शिर्डी-अहमदनगर- दौंड मार्गे पुणे- कोल्हापूर- गोवा असा प्रवास सोपा होणार आहे. या प्रवासामुळे पर्यटन व्यवसायाला नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. रखडलेल्या रोटेगाव- पुणतांबा या रेल्वेमार्गासाठी आता राज्य शासन, शिर्डी संस्थान व दक्षिण मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.तसेच पुणे- अहमदनगर- औरंगाबाद- कन्नड- चाळीसगाव या नव्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य शासनाने यासंबंधीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला नसल्याचे मराठवाडा रेल्वेविकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांचे म्हणणे आहे. नव्याने स्थापन होत असलेल्या नागपूर झोनमध्ये मराठवाड्याचा समावेश न करता मध्य रेल्वेत समावेश करण्यात यावा, ही आमची जुनीच मागणी असल्याचे पुन्हा एकदा लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे. सोलापूर- औरंगाबाद- जळगाव या रेल्वेमार्गालाच रेल्वे बोर्डाने मान्यता देणे कसे गरजेचे आहे, हेही वर्मा पटवून देतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, सोलापूर- बीड- गेवराई- अंबड- जालनामार्गे जळगाव या रेल्वेमार्गाचा सर्व्हे पूर्ण करून तो ३० जून २०१२ रोजी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. या मार्गापासून रेल्वे बोर्ड १४ टक्के नफा अपेक्षित होता; परंतु यात ६ टक्के नुकसान होत असल्याने या मार्गाला सध्या मान्यता मिळालेली नाही. हे पाहता हा रेल्वे मार्ग जालन्याऐवजी औरंगाबादमार्गेच अधिक फायदेशीर ठरणार आहे. या भागात डीएमआयसीमुळे कायापालट होणार आहे. शिवाय पैठण, वेरूळ ही पर्यटनस्थळे आहेतच. हा मार्ग झाल्यास पर्यटन उद्योगाची भरभराट होणार आहे. रेल्वे बोर्डाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
रोटेगाव-पुणतांबा रेल्वे मार्गाचे केवळ २५ कि.मी.चे काम रखडले!
By admin | Updated: June 15, 2014 00:54 IST