औरंगाबाद : शहरात महापालिकेच्या मालकीचे तब्बल १४११ भूखंड असून, यातील अनेक भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. काही भूखंड मूळ जमीन मालकांनी परस्पर विक्री करून टाकले आहेत. काही वॉर्डांमध्ये जमीन खाजगी व्यक्ती आपल्या वारसांच्या नावावर करून घेण्याचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची ही मालमत्ता सांभाळण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरत असल्याचे विदारक चित्र आज सर्वसाधारण सभेत दिसून आले.नगरसेविका शेख समीना यांनी मनपाच्या मालकीचे किती भूखंड आहेत, त्यांची अवस्था काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. प्रशासनाने त्यांना उत्तर देताना सांगितले की, मनपाच्या मालकीचे १४११ भूखंड शहरात आहेत. अवघ्या चार लिपिकांवर या विभागाचा डोलारा चालत असल्याचे उपायुक्त अय्युब खान यांनी सांगितले. नगरसेवक राजू वैद्य यांनी क्रांतीचौक, विद्यानगर वॉर्डात मनपाचे भूखंड कशा पद्धतीने भूमाफिया गायब करीत असल्याची उदाहरणे दिली. विरोधी पक्षनेता जहांगीर खान यांनी कटकटगेट भागात मनपाच्या मालकीचा भूखंड काही नागरिक हडप करीत आहेत.ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनीही नक्षत्रवाडी, पैठण रोडवरील अनेक भूखंड महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या घशात गेले आहेत. नाथ प्रांगण येथेही जागा मूळ मालक आपल्या नावावर करीत आहे.
मनपाचे १४११ भूखंड रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 00:42 IST