नळदुर्ग : ऐतिहासिक, धार्मिक वारसा लाभलेल्या व एकेकाळी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नळदुर्गच्या (ता़तुळजापूर) तालुका निर्मितीचा प्रश्न १९ वर्षापासून लालफितीत अडकला आहे़ नळदुर्ग तालुका व्हावा, यासाठी ६५ ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे पाठिंबा दिला असून, उभारलेल्या आंदोलनादरम्यान ४८ जणांनी न्यायालयीन कोठडीही भोगली आहे़ १९ वर्षानंतर लढ्याची धार कमी झाली असली तरी अनेकांनी नळदुर्गला तालुकानिर्मितीचा दर्जा मिळावा, अशी आशा कायम आहे़निजामाच्या राजवटीत १८५३-१९०५ पर्यंत नळदुर्ग प्रमुख सत्ताकेंद्र व जिल्ह्याचे ठिकाण होते़ १९०५ ते १९५१ पर्यंत उपविभागीय कार्यालय, तालुक्याचे ठिकाण होते़ तसेच १९५१ सालापर्यंत येथे मुन्सफ कोर्टही चालविले जात होते़ १९४६ साली येथील नगर पालिका अस्तित्वात आली़ तर ऐतिहासिक भुईकोट किल्ला, नर-मादी धबधबा, पाणीमहल या ऐतिहासिक वारशासह मैलारपूर, अणदूर येथील तीर्थक्षेत्र खंडोबा, नानीमाँ दर्गाह, रामतीर्थ आदी तीर्थस्थळामुळे धार्मिक वारसाही नळदुर्गला लाभलेला आहे़ राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या शहराशी परिसरातील जवळपास ७० गावांचा दैनंदिन संपर्क आहे़ उमरगा तालुक्याच्या विभाजनावेळी जून १९९९ साली २५ हजार लोकसंख्या व १७ हजार मतदार संख्या असलेल्या नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली़ तुळजापूर हे तालुक्याचे ठिकाण जवळपास ४० कि़मी़दूर आहे़ तर तालुक्यातील शेवटचे गाव कुन्सावळी हे ८० किलोमीटर अंतरावर आहे़ गावा-गावांची तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी होणारी हेळसांड, समोर येणारे प्रश्न पाहता नळदुर्ग शहराला तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी जोर धरू लागली़ यासाठी तालुका निर्मिती कृती समितीचे गठण करण्यात आले़ किसनराव बरगंडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली़ तर उपाध्यक्ष खमरअली सावकार, कार्याध्यक्ष राजा ठाकूर यांच्यासह नय्यर जहागीरदार, सय्यद जमाल, काशिनाथ घोडके, सुनील बनसोडे, कमलाकर चव्हाण व इतर ५० ते ६० जणांनी मागणीसाठी मोठे आंदोलन, लढा उभा केला़ या आंदोलनात ४८ जणांना न्यायालयीन कोठडीत जावे लागले. (वार्ताहर)शासकीय कार्यालयांसाठी जमीनही केली संपादिततालुका निर्मितीनंतर शासकीय कार्यालयांच्या जागेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून पालिकेने जमिनी संपादीत करून ठेवल्या आहेत़ उपजिल्हा रूग्णालय मंजूर असून, त्याचे कामही सुरू आहे़ नळदुर्ग येथे पोलिस ठाण्यासह विविध शाळा, महाविद्यालयेही येथे आहेत़ तालुक्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता नळदुर्गकरांनी केली आहे़पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाचीऔरंगाबाद येथे १९९६ साली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नळदुर्गला तालुक्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही़ पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय व मंत्रिमंडळात वजन असलेले नेते आहेत़ त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, नळदुर्ग तालुका निर्मितीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे़विकासाला चालना मिळेलनळदुर्गला तालुक्याचा दर्जा मिळावा, यासाठी आमचा लढा सुरू आहे़ तालुक्यासाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले आहेत़ तालुक्याचे ठिकाण दूर असल्याने नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे़ नळदुर्गला तालुक्याचा दर्जा मिळाल्यानंतर विकासाला मोठी चालना मिळणार असून, युवकांच्या हातालाही काम मिळणार असल्याचे नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी सांगितले़अन्यथा आंदोलन उभारूपरिसरातील गावांचा पाठिंबा व लाखो नागरिकांची मागणी पाहता शासनाने नळदुर्गला तालुक्याचा दर्जा देणे गरजेचे आहे़ नागरिकांची मागणी वेळेत पूर्ण झाली नाही तर आम्ही पुन्हा जनआंदोलन उभा करू, प्रसंगी प्राणांची आहुतीही देऊ़ त्यामुळे शासनाने नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असे प्रतिपादन तालुका निर्मिती चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते राजा ठाकूर यांनी केले़
तालुका निर्मितीचा प्रश्न १९ वर्षापासून लाल फितीत
By admin | Updated: June 19, 2014 23:50 IST