नृसिंह सूर्यवंशी , घाटनांदूरयेथील ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली असून पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला, नागरिक, अबाल वृद्धांची चिंता ना ग्रामपंचायला आहे, ना निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना. त्यातच तब्बल एक महिन्यापासून पूस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह तब्बल २० गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यात खाजगी पाणीपुरवठाधारक व जारद्वारे पाणीपुरवठा करणारे प्लांट चालक यांची चंगळ होत आहे.पाण्यासाठी सर्वत्रच हाहाकार उडालेला असताना घाटनांदूर व परिसरही त्याला अपवाद नसून तब्बल एक महिन्यापासून घाटनांदूरकरांना तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा, लागत आहे. दैनंदीन कामे सोडून दोन ते तीन किलामिटीर वरून पाणी आणण्याची कसरत करावी लागत आहे. यामध्ये महिलांना आधिक त्रास सहन करावा लागत आहे. येथे ७५ लक्ष रूपये खर्चाची भारत निर्माण योजना राबविण्यात आली. मात्र त्या ठिकाणी फिल्टर प्लांट नसल्याने ते पाणीही पिण्योग्य नाही. तसेच विजपुरवठ्याचे सतत तीन तेरा वाजत असल्याने पाणीपुरवठा होऊ शकत नाही. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षही याला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. घाटनांदुरसह अंबाजोगाई तालुक्यातील १३ आणि परळी तालुक्यातील ६ गावासाठी अशा एकूण १९ गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पुस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही तब्बल एक महिन्यापासून दुरूस्तीअभावी बंद असल्याने पाण्यासाठी दाहिदिशा फिरण्याची वेळ या योजनेवर अवलंबुन असलेल्या गावांतील ग्रामस्थांवर आली आहे. पूस पाणीपुरवठा योजनेवर घाटनांदूरसह अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंतवाडी, पूस, तेलघना, अंबलटेक, साकूड, सुलतानतांडा, वरवटी, अंबलवाडी, गिरवली आपेट, गिरवली बावणे, तळणी, दत्तपूर आणि परळी तालुक्यातील नंदागौळ, लेंडेवाडी, लेंडेवाडी तांडा, नागदरा, आनंदवाडी, दौंडवाडी आदीसह दोन्ही तालुक्यातील मिळून १९ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पूस पाणी पुरवठा योजन खंडीत, विजपुरवठा दुरूस्ती साहित्याचा अभाव, कर्मचाऱ्यांचा वणवा, यामुळे तब्बल बक महिन्यापासून बंद आहे.अंबलवाडी उद्भवन केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही पाणी पुरवठा होऊ शकत नसल्याने योजनेवर अवलंबुन असलेल्या गावांना पाण्यासाठी ओढाताण सहन करावी लागत आहे. त्यातच घाटनांदूर येथे तब्बल ७५ लक्ष रूपयाची भारतनिर्माण मधून पुरक पाणी पुरवठा योजना राबवूनही घाटनांदूरकर तहानलेलेच आहेत. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे या योजेनेचेही तीन तेरा वाजले असून ठराविक भागात त्या योजनेचे पाणी पुरविले जात आहे.भर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या घाटनांदूरकरांना लोकप्रतिनिधीही दाद देण्यास तयार नाहीत. पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक, जीवनावश्यक बाबीसंदर्भात लोकप्रतिनिधीचे मौन असंतोषाची नांदी ठरत आहे. मुलभूत सुविधा पुरविण्यात विद्यमान ग्रामपंचायत अयशस्वी ठरत आहे आणि दुष्काळात तेरावा महिना म्हटल्याप्रमाणे पूस पाणीपुरवठा योजनेचेही तीन तेरा वाजल्याने पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ घाटनांदूरकरांवर आलेली आहे.याबाबत ग्रामविकास अधिकारी बी.डी.जांभळे म्हणाले, पाणीपुरवठ्यासंदर्भात शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत. तर पूस पाणीपुरवठा योजनेचे अभियंता जी.भुजबळ यांना विचारले असता, तांत्रिक कामामुळे पाणीपुरवठा बंद असल्याचे सांगितले.
पूस पाणीपुरवठा योजनेचे वाजले तीन तेरा
By admin | Updated: June 15, 2014 00:55 IST