बीड:राज्यासह जिल्ह्यात दलित अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गोरगरीब दलितांवर अत्याचार होत असून, त्यांचे खून होत आहेत. या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी मानवी हक्क अभियानच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात मागील दोन महिन्यामध्ये दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने कळस गाठला आहे. दादेगाव येथील तरुणाचा खून, नगर जिल्ह्यातील खेर्डा येथील तरुणाची निर्घृण हत्या झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. दलितांवरील अत्याचारात वाढ होत असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाला हे अत्याचार थांबविण्यात अपयश येत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी आंबेडकर चौकातून दुपारी भर उन्हात मानवी हक्क अभियानच्या वतीने अॅड. एकनाथ आवाड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी नगरसेवक विजय अलझेंडे, राजेश घोडे, राजेश क्षीरसागर, बंडू घोडे, छगन क्षीरसागर, मधुकर कांबळे, अप्पा भारजकर, प्रल्हाद दळवी, राधाबाई सुरवसे, सत्यभामा सौंदरमल यांच्यासह पुरुष, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकर्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे यांना दिले. मोर्चात दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. (वार्ताहर)
मानवी हक्क अभियानचा निषेध मोर्चा
By admin | Updated: May 22, 2014 00:11 IST