सतीश जोशी, परभणीआगामी विधानसभा निवडणुकीचे वेध परभणी जिल्ह्यातील आमदारांना लागले असून, त्या दृष्टीने तयारी चालू आहे़ निवडणुकीपूर्वी आमदार निधी खर्च करण्यासाठी प्रस्तावित कामांचा धुमधडाका आमदारांनी सुरू केला आहे़ सर्वात जास्त म्हणजे १ कोटी ८५ लाखांची कामे आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी तर सर्वात कमी म्हणजे ८३ लाखांची कामे आ़ मीराताई रेंगे यांनी प्रस्तावित केली आहेत़ हा आकडा आचारसंहितेपर्यंत वाढू शकतो़ प्रत्येक आमदाराला आर्थिक वर्षामध्ये मतदारसंघातील विकासाची कामे करण्यासाठी प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होतो़ १ एप्रिल २०१४ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून, जिल्ह्यातील आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त झाला आहे़ आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्या तरी त्याची आचारसंहिता आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे़ तत्पूर्वी मिळालेला हा दोन कोटी रुपयांचा निधी जास्तीत जास्त कसा खर्च होईल, यासाठी जिल्ह्यातील आमदार प्रयत्नशील आहेत़ परभणी जिल्ह्यात जिंतूरमधून आ़ रामप्रसाद बोर्डीकर, गंगाखेडमध्ये आ़ सीताराम घनदाट, पाथरीतून आ़ मीराताई रेंगे हे विधानसभेवर निवडून गेले़ विधान परिषदेवर बाबाजानी निवडून आले आहेत़ राज्यमंत्री फौजिया खान यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यामुळे आणि परभणीचे लोकप्रतिनिधी आ़ संजय जाधव हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांचा प्रत्येकी दोन कोटी असा चार कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला या आर्थिक वर्षासाठी मिळाला नाही़ एकूण आठ कोटी निधीतून प्रस्ताव दाखल करण्याचे काम अजूनही चालू असून, प्रस्तावित कामांचा आकडा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे़ कामे मंजूर करून पूर्ण करण्यासाठी आवधी कमी असल्यामुळे लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू आहे़ १़९४ कोटी रुपयांचा निधी शिल्लक एप्रिलपासून आतापर्यंत तीन महिन्यांत हे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या विकास निधीतील आणखी केवळ १.९४ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे.विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निधी खर्च करण्याचा आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आमदारांकडून जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर कामांचे प्रस्ताव प्राप्त होत आहेत. येत्या महिनाभरात या निधीतून विविध कामे सुचविली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी एऩजी़ पतंगे यांनी सांगितले की, आमदारांनी विकासकामे सुचविल्यानंतर प्रशासनातर्फे त्याला मंजुरी दिली जाते. त्या- त्या वर्षाचा निधी खर्च करण्यासाठी त्याच वर्षात कामे सुचवून मंजुरी घ्यावी लागते. ही मंजुरी घेतल्यानंतर ते काम करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. त्यात केव्हाही हे काम केले जाऊ शकते. आतापर्यंत जिंतूरचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी १ कोटी ७८ लाख रुपयांची, पाथरीच्या आ़ मीराताई रेंगे यांनी ८३ लाख रुपयांची, गंगाखेडचे आ़ सीताराम घनदाट यांनी १ कोटी ६० लाख रुपयांची तर विधान परिषद सदस्य आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी १ कोटी ८५ लाख रुपयांची कामे या आर्थिक वर्षात प्रस्तावित केली असल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली़
निधी खर्च करण्यासाठी प्रस्तावांचा धुमधडाका
By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST