मंगळवारी सकाळी ६ वाजता पुणे येथून जळगाव जाणाऱ्या खासगी बसचे अचानक ब्रेक निकामी झाले. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत ही बस घाटाच्या डोंगराकडील भागाला धडकवली. या बसमध्ये पंचवीस प्रवासी प्रवास करीत होते. हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत. चालकाने जर प्रसंगावधान दाखविले नसते, तर याठिकाणी भीषण अपघात घडला असता. ही बाब माहिती पडल्यानंतर सर्व प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.
औरंगाबाद जळगाव महामार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. या मार्गावरील अजिंठा घाटात डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे येथून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मणक्यासह धुळीमुळे श्वसनाचे आजार जडत आहेत. तसेच वाहनांचे अपघात होत आहेत. घाट रस्त्याची एवढी दुरवस्था होऊनही बांधकाम विभाग झोपेत आहे.