औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर शनिवारी रेल्वे प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीस डावलण्यात आल्याने एमआयएमचे खा. इम्तियाज जलील हे रेल्वे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. रेल्वेची बैठक सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी फोनवरून रेल्वे अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत खडेबोल सुनावले.
रेल्वेस्टेशनवर भाजप खा. भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठक सुरू असतानाच रेल्वे अधिकाऱ्यांचे फोन वाजण्यास सुरुवात झाले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) उपिंदरसिंग यांचाही फोन वाजत होता. हा फोन खा. इम्तियाज जलील यांचा होता. बैठकीविषयी आपल्याला माहिती दिली नाही, याविषयी विचारणा करीत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. बैठकीनंतरही रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये याविषयी चर्चा सुरू होती. बैठकीस भाजप नेते आणि कार्यकर्तेच उपस्थित होते. बैठकीचे आमंत्रण नेमके कोणी दिले, याविषयी एकमेकांकडे बोट दाखविण्यात आले.
मी काय करू : भागवत कराड
रेल्वेच्या बैठकीस खा. इम्तियाज जलील यांना बोलावले नाही, याविषयी विचारणा केली असता ‘त्यांना बोलावले नाही, तर मी काय करू,’ अशी प्रतिक्रिया खा. भागवत कराड यांनी दिली.
श्रेय घेण्यासाठीच बैठक : इम्तियाज जलील
रेल्वेची बैठक भाजपाची वाटावी, अशा पद्धतीने बैठक घेण्यात आली. डीआरएम हे सर्वांचे असतात, कोणत्या पक्षाचे नसतात; परंतु भाजप नेते, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. श्रेय घेण्यासाठीच बैठक घेण्यात आली, असे खा. इम्तियाज जलील म्हणाले.
मी पाहणीसाठी आलो : डीआरएम
बैठकीसाठी आमच्याकडून कोणाला निमंत्रण देण्यात आले नव्हते; परंतु बैठकीला कोणीही येऊ शकते, मी पाहणी करण्यासाठी आलो होतो, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) उपिंदरसिंग म्हणाले.