ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - औरंगाबाद व नवी मुंबई महानगरपालिकांमधील निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला असून २२ एप्रिल रोजी या महापालिकांसाठी मतदान होईल तर २३ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेतील १११ तर औरंगाबाद महापालिकेतील ११३ जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर या महापालिका निवडणूक होत असल्याने या निवडणुका चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दोन्ही महापालिकांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नवी मुंबईत वर्चस्व असलेले राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे नवी मुंबईतील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गणेश नाईक यांची राजकीय कस पणाला लागणार आहे. तर औरंगाबादमध्ये एमआयएमचे वाढते वर्चस्व ही सर्वच राजकीय पक्षांसाठी धोक्यांची घंटा ठरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करा अशी मागणी करत जुना विषय उकरुन काढला आहे.
औरंगाबाद व नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे
आचारसंहिता - सोमवारी रात्री मध्यरात्रीपासून ते मतमोजणीच्या दिवशी सर्व निकाल जाहीर होईपर्यंत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी - ३१ मार्च ते ७ एप्रिल
उमेदवारी अर्ज घेण्याची अंतिम तारिख - १० एप्रिल
मतदान - २२ एप्रिल
मतमोजणी - २३ एप्रिल