औरंगाबाद : सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डांतील प्रचार संपण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे सर्व राजकीय पक्ष राजकीय शीतयुद्धाचा धुराळा उडवीत आहेत. दोन्ही वॉर्डांत प्रमुख पक्षांचे ७ उमेदवार असून, साताऱ्यामध्ये ३ आणि देवळाईत ४ उमेदवार आहेत. सर्वांचे जाहीरनामे प्रकाशित झाले असून, ते मतदारांच्या हाती पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांची त्या दोन्ही वॉर्डांत रणधुमाळी सुरू आहे. शहरातील सर्व पदाधिकारी, संलग्न संघटनांचे कार्यकर्ते त्या दोन वॉर्डांत ठाण मांडून आहेत. तासातासाला वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मतदारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करीत असल्यामुळे वॉर्डांतील गर्दी काही हटेना. हायटेक प्रचाराने तर दोन्ही वॉर्डांत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर गल्ली, सोसायटी, अपार्टमेंटनिहाय ग्रुप करण्यात आले असून, प्रत्येक उमेदवाराच्या बाजूने आणि विरोधात प्रचार सुरू आहे. शिवसेनेकडून भाजप विरोधात, काँग्रेसकडून युती विरोधात, तर राष्ट्रवादीकडून तिन्ही पक्षांच्या विरोधात प्रचार केला जातो आहे. जातीनिहाय मतदारांच्या वसाहतींमध्ये विशेष पथके गठीत करून ते पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये पक्षाच्या विद्यमान नगरसेवकाचा समावेश आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जेवढी जोरदार रणधुमाळी झाली नाही, त्याच्या दुप्पट सातारा-देवळाई या दोन्ही वॉर्डात प्रचाराची धूम सुरू आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री रामदास कदम, भाजपकडून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसकडून आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. सेनेच्या दोन, काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादीची एक, भाजपच्या दोन सभा दोन्ही वॉर्डात झाल्या आहेत. देवळाईमध्ये चौरंगी लढत होत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी तेथे लढत आहे. तर साताऱ्यात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, अशी लढत आहे. देवळाईत तीन अपक्ष उमेदवारही आहेत. दोन्ही वॉर्डांची लोकसंख्या १ लाखांच्या आसपास आहे. परंतु २०११ च्या जनगणनेनुसार दोन्ही वॉर्डांत ३० हजार मतदार आहेत. ४कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला मतदारांपर्यंत अजूनही ९पोहोचता आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भरवशावरच मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन सुरू आहे. मेहनतीने जे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचतील आणि मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढतील, यश त्यांचेच असेल.
साताऱ्यात शीतयुद्धाचा राजकीय धुराळा
By admin | Updated: April 15, 2016 01:47 IST