लातूर : लातूर शहर मनपाच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर देखरेख आणि नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी कमलाकर फड, प्रकाश खपले, डॉ. प्रताप काळे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घेऊन शहराची पाहणी केली. दरम्यान, शहरातील प्रत्येक कुटुंबाला आठ दिवसांआड २०० लिटर पाणी देण्याचे नियोजनही त्यांनी शनिवारी केले. महानगरपालिकेत प्रभाग अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी घेतली. शिवाय, टँकर भरणास्थळाला भेटी देऊन पाणी किती संकलित झाले आहे, याची माहिती घेतली. सद्य:स्थितीत लातूर शहरातील जलकुंभामध्ये ३ लाख लिटर्स पाणी उपलब्ध आहे. शिवाय, मोठ्या क्षमतेच्या टँकरद्वारे आणखी पाणी डोंगरगाव, भंडारवाडी निम्न तेरणातून पाणी आणले जात आहे. या पाण्याचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठी या तिन्ही अधिकाऱ्यांनी मनपातील अधिकाऱ्यांसमवेत रविवारी चर्चा केली. दरम्यान, वॉर्ड अधिकाऱ्यांची आणि नगरसेवकांची उद्यापासून बैठका घेऊन प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर्स पाणी आठ दिवसांआड देण्याचा मनोदय उपरोक्त अधिकाऱ्यांचा आहे. शिवाय, या तिघांनीही वॉर्डनिहाय पाणी वितरणाचे नियोजन केले असून, शहरातील ३५ वॉर्ड या तिघांनी विभागून घेतले आहेत. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, खोरी गल्ली, खोपेगाव, सरस्वती कॉलनी या भागांत पाहणी करून बोअर घेतल्यास पाणी लागेल का, याची चाचपणी करण्यात आली असून, येथे बोअर घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शहरातील ३५ वॉर्डांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजन केले जात आहे. ३५ वॉर्ड आम्ही तिघांनी विभागून घेतले आहेत. त्यानुसार तेथे नियोजन केले जाईल. रविवारी शहराची पाहणी करून मनपातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे कमलाकर फड यांनी सांगितले.
आठ दिवसांआड प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर पाणी देण्याचे नियोजन
By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST