बीड : ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी उभारण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांमध्ये केवळ कागदी घोडे नाचवून अनुदान पदरात पाडण्याचा खेळ सुरू आहे़ सीईओ नामदेव ननावरे यांनी रविवारी केलेल्या पंचनाम्यातच ही बाब उघडकीस आली़ पाटोदा तालुक्यातील एका वसतिगृहात पटावर ८४ विद्यार्थ्यांची नोंद असताना प्रत्यक्षात केवळ २९ विद्यार्थी आढळले़रविवारी सुटीचा दिवस असतानाही सीईओ ननावरे यांनी पाटोदा तालुक्यातील वहाली येथे दौरा केला़ सकाळी साडेनऊ वाजता कुसळंब येथे त्यांना जि़ प़ ची शाळा दिसून आली़ या शाळेतच पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह उघडण्यात आले आहे़ननावरे यांची गाडी शाळेजवळ पोहचली़ ते तडक शाळेत दाखल झाले़ त्यांनी विद्यार्थ्यांचे हजेरीपट पाहिले तेव्हा हंगामी वसतिगृहात ८४ विद्यार्थ्यांची नोंद असल्याचे दिसून आले़ वसतिगृहातील विद्यार्थ्यांची त्यांनी डोकेमोजणी केली तेव्हा प्रत्यक्षात केवळ २९ विद्यार्थीच हजर असल्याचे निष्पन्न झाले़ ५५ विद्यार्थी गेले कुठे ? असा सवाल त्यांनी तेथील स्वयंसेवकास विचारला़ तेव्हा सुटी असल्याने ते नसल्याचा दावा करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी त्यांनी वसतिगृहातील जेवणाची व्यवस्थाही पाहिली़ मुख्याध्यापकाला नोटीसननावरे यांनी भेट दिल्याचे कळताच मुख्याध्यापक ए़ एऩ चिंचकर हे शाळेत दाखल झाले़ मात्र तोपर्यंत ते निघून गेले होते़ परत येताना त्यांनी मुख्याध्यापक चिंचकर यांना विद्यार्थी संख्येबाबत विचारणार केली़ कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले़ (प्रतिनिधी)
पटावर ८४, प्रत्यक्षात २९
By admin | Updated: December 29, 2014 00:57 IST