लोहारा : तालुक्यातील नागूर येथील एका ५५ वर्षीय महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पार्थिव लोहारा पोलिस ठाण्यात आणून ठेवले होते़ उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागूर येथील जमीनीच्या वादातून बाजार समितीचे माजी सभापती दिनकर जावळे-पाटील व कलावती कुशेंद्र कांबळे (वय-५५) यांच्यात २५ नोव्हेंबर रोजी हाणामारी झाली होती़ या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कलावती कांबळे यांना लोहारा, उस्मानाबाद येथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथील रूग्णालयात नेण्यात आले होते़ मात्र, सोमवारी सकाळी उपचारादरम्यान कलावती कांबळे यांचा मृत्यू झाला़ त्यानंतर नातेवाईकांनी मंगळवारी सकाळी पार्थिव थेट लोहारा पोलिस ठाण्यात आणले़ कलावती कांबळे यांचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत दिनकर जावळे-पाटील, विनोद दिनकर जावळे व इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली़ शेकडो नातेवाईकांसह राजकीय पदाधिकारीही ठाण्यात दाखल झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते़ उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सहा तासानंतर कलावती कांबळे यांचे पार्थिव नागूर येथे नेवून अंत्यसंस्कार करण्यात आले़ (वार्ताहर)मयत कलावती कांबळे यांचा मारहाणीत मृत्यू झाला असून, मारहाण करणाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विविध पक्षांच्या नेतेमंडळींनीही लोहारा ठाण्यात धाव घेतली होती़ यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे, जि.प.सभापती हरिश डावरे, प्रदेश चिटणीस संजय बनसोडे, प्रा़डीक़ेक़ांबळे, दिलीप भालेराव, राम गायकवाड, तानाजी कदम, धीरज बेळंबकर, मुकेश सोनकांबळे, आनंद पांडागळे, दयानंद बनसोडे, गजेंद्र डावरे, मल्हारी बनसोडे, विष्णू वाघमारे, दत्ता रोंगे, दिगंबर कांबळे, विठ्ठल बनसोडे, केशव इगवे, सिध्दार्थ राजेगावकर आदीनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेवून कारवाईची मागणी केली़संतप्त नातेवाईकांची मागणी पाहता उपविभागीय पोलिस अधिकारी एम़ राकेश कलासागर यांनी कलावती कांबळे यांचा मुंबई येथील रूग्णालयात मृत्यू झाला आहे़ तेथे शवविच्छेदन झाले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन नातेवाईकांना दिले़ कलासागर यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले़आंदोलनाचा इशारा४नागूर येथील दलितांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन कृती समितीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली़ अन्यथा जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे़
खुनाच्या गुन्ह्यासाठी पार्थिव पोलिस ठाण्यात ठेवले !
By admin | Updated: December 3, 2014 01:16 IST