संजय खाकरे , परळीकेंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी असलेल्या परळीत मागील २९ वर्षांपासून कमळाचीच हुकुमत आहे़ मुंडेंच्या उत्तुुंग राजकीय कारकीर्दीचा साक्षीदार असलेला हा मतदारसंघ त्यांच्या जाण्याने पोरका झाला आहे़ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेतील़़ आयुष्यभर जवळून राजकारण पाहणाऱ्या; पण सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेल्या प्रज्ञाताई मुंडे यांना आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युतीकडून उमेदवारी मिळू शकते़परळी तालुका पूर्वी रेणापूर मतदारसंघात होता. या मतदारसंघातून गोपीनाथराव मुंडे तब्बल पाच वेळा विधानसभेत निवडून गेले. २००९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे व काँग्रेसचे प्रा. टी.पी. मुंडे यांच्यात थेट लढत झाली होती. नवख्या पंकजा यांनी प्रा. मुंडे यांचा दारुण पराभव केला होता. गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण मतदारसंघावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुंडे यांचा वारसा पुढे नेण्यासाठी पंकजा पालवे यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे, असा आग्रह कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यामुळे त्यांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतलाच तर युतीला ऐनवेळी पर्यायी उमेदवार शोधावा लागेल. तसे झाले तर प्रज्ञाताई मुंडे हा युतीसाठी भक्कम पर्याय ठरू शकतो़ त्यांचा राजकारणाशी कधी थेट संबंध आलेला नाही; पण त्यांनी राजकारणातील चढउतार जवळून पाहिलेले आहेत़ त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांनी मतदारसंघाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्यांना यानिमित्ताने मिळू शकते़ मुंडेंच्या पत्नी म्हणून परळीकर त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहतील, असे चित्र आहे़दुसरीकडे मागील २९ वर्षांपासून दोन्ही काँग्रेसला या मतदारसंघात सातत्याने पराभव पहावा लागला आहे. मुंडेंचा प्रभाव दूर करणे तर सोडाच; पण तो कमी करण्याचे गणितही आघाडीला जमले नाही़ यावेळी देखील काँग्रेस आघाडीसाठी पोषक वातावरण नाही. फरक इतकाच की गतवेळी गोपीनाथराव मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितराव मुंडे व पुतणे धनंजय मुंडे हे भाजपात होते ते आता राष्ट्रवादीच्या तंबूत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फुलचंद कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात उडी घेतली. ते पूर्वाश्रमीचे भाजपाचेच़ त्यांच्या भाजपाप्रवेशाने राष्ट्रवादीला हादरा बसला आहे़पंकजा यांच्यावरील जबाबदारी वाढलीपंकजा पालवे यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या प्रश्नांसाठी भांडणाऱ्या पंकजा यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांना २५ हजार मतांची ‘लीड’ मिळाली होती. आता मुंडे नाहीत़ पित्याकडून मिळालेले राजकारणाचे धडे त्यांना फायद्याचे ठरतील़ मुंडे ग्रामविकास मंत्री झाल्यावर सामान्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. देशाच्या राजकारणात प्रवेश करुन या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आ. पालवे यांच्यावर आहे. धनंजय मुंडेंची भूमिका काय?काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून विधानसभेसाठी कोण? याचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे आ. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या आश्रयाला आहेत; परंतु मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची भूमिका काय? हे देखील स्पष्ट नाही. त्यांनी आपले पत्ते आणखी ‘ओपन’ केलेले नाहीत़ त्यामुळे धनंजय मुंडेंच्या भूमिकेने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे़
परळी मतदार संघावर हुकमत भाजपाचीच !
By admin | Updated: June 9, 2014 00:05 IST