सितम सोनवणे ,लातूरशासनाच्या सुकन्या योजनेस लातूर जिल्ह्यातील ८५ लाभार्थी पालकांनी प्रस्ताव दाखल केले आहेत़ वेगवेगळे प्रमाणपत्र गोळा करावे लागत असल्याने या योजनेकडे लाभार्थी पाठ फिरवत आहेत़सुकन्या योजनेंतर्गत राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्यात सुधारणा करणे, भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बाल विवाह रोखणे आणि मुलींंचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने योजना सूरु करण्यात आली़ या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे़ योजनेची सुरूवात होऊन सात महिन्याचा कालावधी लोटला आहे़ महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे़ शहर व ग्रामीण असे दोन भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी कुटुंबातील फकत दोन अपत्यांपर्यंत लागू आहे़ मुलींच्या नांवे जन्मत: २१,२०० रुपये एक वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून मुलीस वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १ लाख रुपये इतकी रक्कम प्रदान करण्यात येणार आहे़ तसेच आम आदमी योजनेंतर्गत मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून १०० रुपयांचा प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करुन मुलीच्या पालकांचा विमा उतरविला जाईल ज्यात पालकांचा मृत्यू,अपघात अशी परिस्थिती ओढविल्यास ७५ हजार, नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार, दोन डोळे अथवा दोन अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ७५ हजार, एक डोळा व एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ३७,५०० रुपये देण्यात येतात़ आम आदमी विमा योजनेतून लाभार्थी मुलींस ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती प्रती ६ महिने इयत्ता नववी ते बारावीमध्ये मुलगी शिकत असताना दिली जाईल़ सर्व निधी राज्य शासनाच्या नावे असणाऱ्या मुलीच्या सरप्लस खात्यात जमा करण्यात येतो़
सुकन्या योजनेकडे पालकांची पाठ !
By admin | Updated: September 18, 2014 00:40 IST