विकास राऊत, औरंगाबादमहापालिकेचे बहुचर्चित पीपीपी या धर्तीवरील समांतर जलवाहिनीचे काम सुरू होऊन २ महिने झाले असले तरी २०० कोटींच्या रकमेवरून जलवाहिनीच्या कामाचे घोडे अडले आहे. नवीन राज्य सरकार सत्तेवर आल्यानंतरच योजनेच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे. शासनाकडून महागाई निर्देशांकानुसार वाढलेले २०० कोटी रुपये मिळाले नाहीत, तर ती रक्कम जनतेकडूनच वसूल केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन महिने उलटले असून कामाला अजून सुरुवात झालेली नाही. नागरिकांच्या माथी वाढीव पाणीपट्टी आणि टंचाई आलेली आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या १६२ कोटी रुपयांच्या निधीवर ७० कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. या ७० कोटींवर योजनेचे कंत्राटदार कंपनीचा डोळा आहे. घाट्यात काम सुरू केल्यामुळे ते ७० कोटी रुपये पदरात पडल्यास व वाढीव २०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाल्यास जलवाहिनीसाठी लागणारे पाईप खरेदी करण्यासाठी पाऊल उचलले जाईल. असे सूत्रांनी सांगितले. २०११ रोजी झालेल्या अंतिम निविदा व करारानुसार १० एमएम जाडीची १७०० मि़मी़व्यासाची पाईपलाईन पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्याचे काम प्रस्तावित आहे़ त्या जलवाहिनीचा दर करारावेळी २४ हजार ८६७ रुपये रनिंग मीटर होता़ वर्ष २०१२-१३ च्या डीएसआरनुसार त्या जलवाहिनीचा दर २५ हजार ३८२ रु़रनिंग मीटर झाला आहे़ ५१५ रुपये प्रति रनिंग मीटर दर वाढल्यामुळे २५ कोटी रुपयांनी जलवाहिनी महागली. सध्या हा दर ६१५ रुपयांच्या आसपास गेला आहे. पैठण ते नक्षत्रवाडी हे अंतर ४५ कि़मी़ आहे़ १ कि़मी़मध्ये अंदाजे १ हजार मीटर अंतर असते़ त्यानुसार ४५ हजार मीटर अंतराची जलवाहिनी समांतरच्या योजनेत टाकावी लागेल़ ६१५ रुपये प्रति रनिंग मीटरप्रमाणे ३२ कोटी १७ लाख ५ हजार रुपये जास्तीचा खर्च वाढला आहे़ १२४ कोटी २१ लाख ९० हजार रुपये जलवाहिनीवर खर्च होणार आहेत़ ३०० मि.मी़च्या अंतर्गत जलवाहिन्या पॉलिथिलीनच्या असतात़ त्यावरील एमएसच्या असतात़ शहरात ४००, ५००, ६०० मि़मी़व्यासाच्या जलवाहिन्या आहेत़ त्यामध्येही दरवाढ झाल्याचे डीएसआरवरून दिसते़
समांतरचे गाडे रुतले...!
By admin | Updated: October 27, 2014 00:13 IST