औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला करार रद्द करण्यासाठी मनपाने ५ एप्रिल रोजी नोटीस पाठविली होती. मागील आठवड्यात कंपनीने मनपाला उत्तरही दिले. आता करार रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेला घ्यावा लागणार आहे. शिवसेना थेट करार रद्द करण्यास तयार नाही. शहरातील पाण्याचा प्रश्न आपल्या अंगलट येईल म्हणून भाजपही सावध भूमिका घेत आहे.शासनादेशानुसार ५ एप्रिल रोजी मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी कंपनीला करार रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस पाठविली. मागील आठवड्यात ३९ पानांचे उत्तर कंपनीने मनपाला दिले आहे. या उत्तरावर मनपा प्रशासन कोणतेही भाष्य करायला तयार नाही. कारण समांतर जलवाहिनीचा करार सर्वसाधारण सभेने केला आहे. करार रद्द करा, असा प्रस्ताव मनपा प्रशासन सर्वसाधारण सभेत ठेवणार नाही. कंपनीचे उत्तर आणि शासनाने दिलेले निर्देश सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येतील. त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. शिवसेना थेट करार रद्द करण्यास तयार नाही. भाजपही सावध भूमिका घेत आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या कोर्टात चेंडू आहे.
समांतरचा फास युतीच्या गळ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:48 IST