दरवर्षीप्रमाणे यंदाही घाटनांद्रा शिवारातील ७० टक्के शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी मिरची पिकाची लागवड केली. नगदी पैसा मिळवून देणारे पीक म्हणून या मिरचीकडे पाहिले जाते. मिरची पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी हतबल झालेला आहे. तरीदेखील शेतकऱ्याने पुन्हा जोमाने लागवड केली. परंतू मिरची पिकांवर आता कोकडा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. औषधी फवारणी करूनही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. झाडे वाचवण्यासाठी या पिकावर कोणते औषध फवारणी करावी, याबाबत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी योगेश्वर मोरे, विजय मोरे, भागवत मोरे, शिवाजी मोरे या शेतकऱ्यांनी केली. कृषी सहायक अजय राठोड यांनी सांगितले शेतकऱ्यांनी निंबोळी फवारणी करावी. त्याचबरोबर काही रासायनिक औषधांचा वापर केला तर रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे.
घाटनांद्रा शिवारातील मिरची पिकावर ‘कोकडा’ चा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:05 IST