व्यंकटेश वैष्णव, बीडभविष्यात पाणी टंचाई रोद्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज स्थितीत बीड जिल्ह्यात उपयुक्त पाणीसाठा ५.३८ टक्के इतकाच शिल्लक असून हेच पाणी जुलैपर्यंत (पावसाळा सुरू होईपर्यंत) पुरवावे लागणार आहे.बीड जिल्ह्यात लघु व मध्यम असे १४१ प्रकल्प आहेत. यामध्ये कृष्णखोरे व गोदावरी खोरे असे दोन भाग पडले आहेत. कृष्णाखोरे अंतर्गत एकूण ८० प्रकल्प आहेत. यातील ४३ प्रकल्पांमध्ये ज्योत्याखाली पाणी आहे. तर २० धरणे कोरडीठाक पडले आहेत. गोदावरी खोरे अंतर्गत ४६ लघु तर ४ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये देखील ‘सील लेव्हल’ च्या खाली पाणी साठा असल्याचा अहवाल जायकवाडी पाठबंधारे विभागाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.उन्हाच्या कडाक्यामुळे बाष्पीभवनमागील दोन ते तीन दिवसात बीड जिल्ह्यात ३९ अंश पर्यंत तापमान गेले आहे. याचा परिणाम लघु व मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या बाष्पीभवनावर होत आहे. माजलगाव येथील मोठया प्रकल्पात आज स्थितीत १०६.१० दलघमी पाणीसाठी आहे. याप्रकल्पातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. दिवसाला ५.२० मिलियन मीटर पाणी बाष्पीभवन होत असल्याचे पाठबंधारे विभागातील अधिकारी एफ. एम. शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.अनाधिकृत पाणी उपसा सुरूचबीड जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमध्ये पाणी साठा आहे. त्याठिकाणी अनधिकृतपणे विद्युतपंप बसवलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने पिण्यसासाठी आरक्षित केलेले लाखो लिटर पाणी दररोज उपसले जाते. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बीड जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता मागील तीन महिन्यापूर्वीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बीड जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठी पिण्यासाठी आरक्षीत केलेला आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असताना देखील बीड जिल्ह्यातील काही प्रकल्पांवर विद्युत पंप बसवून शेतीसाठी पाणी घेतले जाते. याबाबत दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व एसडीओ यांची बैठक घेवून आरक्षीत पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबतच्या कारवाया होत नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
केवळ पाच टक्के पाणीसाठा शिल्लक
By admin | Updated: April 1, 2015 01:01 IST