शिराढोण : जलयुक्त शिवार अभियानादरम्यान शिराढोण (ताक़ळंब) शिवारातील दाहिऱ्या परिसरातील ढोरी नदीपात्रात खोलीकरणाचे काम सुरू असताना केवळ १२ फुटावर पाणी लागले आहे़ या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे़अल्प पावसामुळे मागील तीन-चार वर्षापासून शिराढोण व परिसरात सातत्याने दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे़ या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी आ़ राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून जलयुक्त शिवार अभियानाचे काम सुरू करण्यात आले आहे़ यासाठी आ़ पाटील यांनी दोन लाख रूपयांचा निधी दिला होता़ शिवाय शेतकरी, ग्रामस्थांना लोकवाटा जमा करण्याचे आवाहन केले होते़ या अनुषंगाने कैलास पाटील, पद्माकर पाटील, किरण पाटील यांनी काही दिवसातच एक लाख रूपयांचा लोकवाटा जमा केला होता़ त्यानंतर मागील दीड महिन्यापासून ढोरी नदीच्या पात्रात खोलीकरण- रूंदीकरणाचे काम सुरू होते़ हे काम सुरू असताना दाहिरा शेताच्या शिवारातील नदीपात्रात केवळ १२ फुटावर पाणी लागले आहे़ ही घटना परिसरात कळताच शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी या पाणी लागलेल्या दाहिरा नदीपात्राकडे धाव घेतली़ दुष्काळी स्थितीत केवळ १२ फुटावर लागलेले पाणी पाहता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले़ या पाण्यात बच्चे कंपनी पोहण्याचा आनंद लूटत आहेत़ या परिसरातील अनेक जलस्त्रोत अटले असून, जनावरांच्या पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही़ अशा परिस्थितीत हे पाणी लागल्याने हा विषय कुतूहलाचा, चर्चेचा बनला आहे़ त्यामुळे निसर्गाची करणी आणि ढोरी नदीत पाणी, अशी चर्चाही होत आहे़ (वार्ताहर)दाहिरा हे शेत शिराढोण गावापासून केवळ ४० मीटर अंतरावर आहे़ पूर्वीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता़ तेव्हा उन्हाळ्यात गावातील आड- बारव यातील पाण्याने तळ गाठल्यानंतर ग्रामस्थांना दाहिऱ्याच्या शेतातील नदीवर लहान दगडाच्या चिऱ्याने बांधलेल्या विहिरीचा आधार मिळत होता़ या विहिरीचे पाणी पिण्यासाठी नागरिक आणत होते़ नदीपात्रातील पाणी हे सांडपाणी म्हणून वापरले जात असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक देविदास गाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़शिराढोण येथे सुरू असलेले नदी रूंदीकरण व खोलीकरणाचे काम उत्कृष्ठ प्रकारे सुरू आहे़ या कामाचा आदर्श घेवून इतर गावांनीही जलसंधारणाची कामे करून गावचा परिसर जलयुक्त करावा, असे आवाहन आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले़जलसंधारणाचे काम करणाऱ्या दोन आॅपरेटरसह दहा ट्रॅक्टर चालकांना दररोज १५० ते २०० लीटर पिण्याचे पाणी लागत होते़ मात्र, या परिसरात पाणी नसल्याने त्यांना एक ते दीड किलोमीटर भटकंती करावी लागत असे़ शेतात लाईट नसल्याने पाणी उपलब्ध करणे मुश्किल होत होते़ मात्र, या नदीपात्रात पाणी लागल्याने चालकांची सोय झाली असल्याचे जलसंधारणाचे नियोजक किरण पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
अवघे १२ फुटावर लागले पाणी
By admin | Updated: May 25, 2015 00:26 IST