दत्ता जोशी, घाटनांद्रा सिल्लोड तालुक्यात कांद्याच्या बियाणास सोन्याचा भाव आला असून, गारपिटीतून वाचलेल्या कांद्यापासून शेतकर्यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून बियाणाच्या कांद्यापासून शेतकर्यांना उत्पन्न तर सोडाच; पण मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. दुष्काळी परिस्थितीत बर्याच शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही कांद्याने हात दाखवला होता. पेरणीसाठी सर्वांत जास्त खर्च लागणारे हे पीक असून, चांगला भाव मिळाला तरच बियाणाच्या कांद्याची लागवड करणे परवडते, असे संबंधित शेतकर्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून १० ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळणार्या भावामुळे शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागलेले असतानाही कांद्याच्या बियाणाची लागवड शेतकरी कधी तरी भाव मिळेल या आशेने करीत आहेत. यंदा भाव चांगला मिळत असल्याने त्यांच्या आशेची निराशा झालेली नाही. नुकसान झाले असले तरी शेतकरी सध्या आनंदात आहेत. कांदा बियाणे खरेदी करणारे शेतकरी सांडूअप्पा कोठाळे म्हणाले की, मागील वर्षी कमी पाणअभावी लागवड झाली नव्हती. यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवड झाली; परंतु गारपिटीच्या तडाख्यात कांदा बियाणाचे हजारो एकर पीक भुईसपाट झाल्याने म्हणावे तसे उत्पादन होणार नाही. भावात दिवसाकाठी तेजी राहणार आहे. यंदा या भागात चांगला पाऊस झाल्याचा फायदा घेऊन कधीही लागवड न करणार्या शेतकर्यांनी बियाणाच्या कांद्याची लागवड केली; परंतु गारपिटीच्या तडाख्यातून हे नाजूक असलेले पीक टिकाव धरू शकले नाही व या कांद्याचे मोठे नुकसान झाले; परंतु या तडाख्यातून वाचलेल्या या बियाणास सुरुवातीसच ४० ते ४५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातावरण असले तरीही मिळणार्या भावामुळे व गारपिटीने नुकसान झालेल्या कांद्याचे दु:खही तेवढेच जाणवत आहे.
बियाणाच्या कांद्याचे सोने
By admin | Updated: May 21, 2014 01:11 IST