औरंगाबाद : महापालिकेत जलवाहिन्या, ड्रेनेज, पथदिवे, अंतर्गत रस्ते, हायमास्ट टाकण्यासंबंधीच्या सुमारे १ हजार संचिका तुंबल्या आहेत. त्या कामांना सुमारे ५० कोटी रुपये लागणार असून, ही रक्कम आगामी काळात मनपाला उत्पन्नरूपातून मिळणे अशक्य आहे. या कामांच्या संचिकांचा निपटारा झाला तरी ती कामे सुरू होणे अवघड असणार आहे. मनपा निवडणुका एप्रिल २०१५ मध्ये होणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता मार्च २०१५ च्या पहिल्या आठवड्यात लागेल. तत्पूर्वी, जास्तीत जास्त संचिका मंजूर करून विकासकामे करण्यासाठी नगरसेवक धावपळ करीत आहेत. मात्र, मनपाची आर्थिक परिस्थिती सध्या डबघाईला आलेली आहे. नवीन कामे न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, नगरसेवकांच्या प्रलंबित असलेल्या सर्व संचिका शहर अभियंत्यांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुंबलेल्या संचिकांपैकी किती संचिकांना मंजुरी द्यायची याचा समन्वयाने विचार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्याची संचिकांवर काहीही निर्णय घेतला जात नाही. अंतर्गत रस्ते आणि पथदिव्यांच्या संचिकादेखील मंजुरी मिळण्याच प्रतीक्षेत आहेत; परंतु आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखाधिकारी यांच्यातील असमन्वयामुळे संचिकांना मुहूर्त लागत नाही. याचा उद्रेक म्हणून नगरसेवकांनी उपोषणाचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. शहरात ९९ वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डातील किमान १० संचिका तरी निर्णयाअभावी ठप्प आहेत. ५० लाख रुपयांच्या आसपास एकेका वॉर्डात कामे आहेत. २०१५ साली ज्यांना पुन्हा निवडणूक लढवायची आहे. त्यांची वॉर्डात कामे करण्यासाठी धावपळ सुरू आहे. विद्युत, ड्रेनेज, बांधकाम विभागांच्या अभियंत्यांच्या दालनात नगरसेवक हेलपाटे घालीत आहेत. निवडणुका जवळ आल्यामुळे अभियंते नगरसेवकांना भाव देत नसल्याचे दिसते. ४मनपाला सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न ४०० कोटींच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. सध्या २०० कोटींची उत्पन्न मिळाले आहे. यंदाचे बजेट ८०० कोटींचे आहे. २०१५ मध्ये मनपाच्या निवडणुका असून, विद्यमान नगरसेवकांचे हे अंतिम बजेट आहे.\४५ कोटींचे रस्ते, ४६४ कोटींची भुयारी गटार योजना, समांतरसाठी दरमहा साडेपाच कोटी रुपये, पथदिव्यांसाठी मनपाला प्राधान्यक्रम देऊन खर्च करावा लागणार आहे. शिल्लक कामांचा डोंगर १०० कोटींवर गेला आहे.
मनपात एक हजार संचिका तुंबल्या
By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST