बदनापूर : तालुक्यातील गेवराई बाजार येथे पूर्ववैमनस्यातून एका इसमाचा खून करण्यात आल्याची घटना १९ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेवराई बाजार येथे १९ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान येथील आॅटोरिक्षा थांब्यावर शिवाजी जगन्नाथ गाडेकर (वय ४२) यास मागील भांडणाच्या कारणावरून यातील आरोपींनी शिवीगाळ करून चापटाबुक्याने मारहाण केली. जगदीश कुबेर याने पोटात चाकूचे तीन वार केले. शिवाजी यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी मयताचे भाऊ नंदकिशोर जगन्नाथ गाडेकर यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले की, ‘सुमारे एक वर्षापूर्वी संगीता कुबेर व तिचा भाऊ संतोष लहाने यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी माझा भाऊ शिवाजी यास मारहाण झाली होती. त्याने याबाबत तक्रार केली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरून या आरोंपीनी त्याचा खून केला.’ असे नमूद केले होते. दरम्यान, या तक्रारीवरून संतोष लालाभाऊ लहाने, संगीता एकनाथ कुबेर, जगदीश एकनाथ कुबेर, ऋषिकेश एकनाथ कुबेर, लालाभाऊ पुंजाराम लहाने, राधाबाई लालाभाऊ लहाने (रा. गेवराई बाजार) यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि पंकज जाधव हे करीत आहेत. (वार्ताहर)मानेगावात अपघातजालना तालुक्यातील मानेगाव येथे एका लग्नसमारंभासाठी येत असलेली कार रामनगर रोडवर पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. कारमध्ये सहा प्रवाशी बसलेले होते. कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, यााबाबत पोलिसांत नोंद नव्हती.
पूर्ववैमनस्यातून एकाचा खून
By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST