परंडा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सुरु करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असून, याद्वारे मिळणाऱ्या करामुळे डबघाईस आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीलाही उर्जीतावस्था आल्याचे दिसत आहे. सीना-कोळेगाव धरणामुळे सिंचनक्षेत्रात वाढ होत असतानाच अत्यल्प पावसामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला. याचा परिणाम शेती उत्पादनावर होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीलाही याचा फटका सहन करावा लागला. केवळ तीन ते चार व्यापाऱ्यांवर बाजार समितीचा कारभार सुरू होता. यातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही बाजार समितीला कठीण जात होते. परंतु, दीड वर्षांपासून चालू करण्यात आलेल्या कांदा आडत व जनावरांचा बाजार यामुळे आवक वाढून मिळणाऱ्या कर उत्पन्नातून बाजार समितीची आर्थिक स्थिती सुधारताना दिसत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी कुठल्याही जनावराची खरेदी-विक्री करायची म्हटले तरी वालवड, कुर्डूवाडी, बार्शी अशा दूरच्या अंतरावर जावे लागत होते. यात त्यांचा वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. वास्तविक दर रविवारी परंडा येथे भाजी-पाल्याचा आठवडी बाजार भरतो. यासाठी परिसरातील अनेक गावातून व्यापारी व ग्राहक येथे येतात. त्यामुळे याच दिवशी कांदा आडत आणि जनावरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आणि दीड वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. येथे कांद्याला योग्य दर मिळत असल्याने तालुक्यासह शेजारील तालुक्यातूनही अनेक कांदा उत्पादक येथील आडतीवर आपला कांदा घालू लागले. या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधीही मिळाल्या. तसेच व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या कराच्या माध्यमातून बाजार समितीच्या उत्पन्नातही भर पडली. तसेच जनावरांच्या बाजारातूनही लाखो रुपयांची विक्री होत आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे बैलांची खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे रविवारच्या (२४ मे) बाजारात दिसून आले. पन्नास हजारांपासून बैलजोड्यांच्या किंमती होत्या. विविध ठिकाणाहून शेतकरी, व्यापारी येथे जनावरांच्या खेरेदी-विक्रीसाठी आले होते. एकूणच जनावरांचा बाजार आणि कांदा आडत चालू करण्याचा निर्णय बाजार समितीला फायद्याचा ठरला असून, यातून समितीची आर्थिक स्थिती सुधारत आहे. पूर्वी जनावरे खरेदी करण्यासाठी वालवड, बार्शी किंवा कुर्डवाडी या ठिकाणी जावे लागत होते. परंतु, मागील वषार्पासून परंडा बाजार समितीने जनावरांबाजार सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची सोय झाल्याचे अनिल शिंदे, रोपळे (ता. माढा) येथील अशोक आटकले यांनी सांगितले. (वार्ताहर)
जनावरांच्या बाजारामुळे समितीला उर्जीतावस्था
By admin | Updated: May 25, 2015 00:25 IST