संजीवकुमार देवनाळे , किनगावसर्वांना ‘उजेड’ देणाऱ्या महावितरणचा कारभारच ‘अंधारात’ सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. किनगाव येथील ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्राला कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नाही. सध्या प्रभारीवरच कारभार सुरू असून, प्रभारी अधिकारीही या ठिकाणी थांबत नसल्याने विद्युत ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे तक्रार निवारण दिवशीही अधिकारी भेटत नसल्याची मोठी समस्या आहे. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्राअंतर्गत ४५ गावांचा समावेश आहे. त्यात किनगावसह चिखली, कोपरा, सोनवणेवाडी, सिरसाटवाडी, कोळवाडी, मोळवण, मोळवणवाडी, हिंगणगाव, देवकरा, दगडवाडी, मोहगाव, चाटेवाडी, हंगेवाडी, खानापूर, गुंजोटी, सताळा, धानोरा, साळुंकवाडी, कोपदेव हिप्परगा, सोनखेड, मानखेड, केंद्रेवाडी, पाटोदा आदी गावांचा समावेश आहे. या उपकेंद्राअंतर्गत चार हजारपेक्षा जास्त विद्युत ग्राहक आहेत. परंतु, या ग्राहकांसाठी आवश्यक असलेले कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी आहे. काही वर्षांपूर्वी उपकेंद्रात १५ कर्मचारी होते. त्यातील काहींची बदली झाल्याने व काही सेवानिवृत्त झाल्याने सध्या सातच कर्मचारी कार्यरत आहेत. ग्राहकांना विजेसंदर्भात कुठलीही समस्या उद्भवल्यास उपकेंद्राकडे धाव घ्यावी लागते. मात्र अधिकारीच भेटत नाहीत.
तक्रार निवारण दिवशीही अधिकारी भेटेनात !
By admin | Updated: December 19, 2015 23:48 IST