औरंगाबाद : मनमाड-काचीगुडा रेल्वेतून पडल्याने एका प्रवाशाचा पाय रेल्वेखाली गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी लासूर स्टेशनजवळ घडली. यावेळी सदर प्रवासी दरवाजाजवळ बसलेला असल्याने डुलकी लागल्याने त्याचा तोल गेला आणि रेल्वेतून पडल्याने तो गाडीखाली आला होता. या व्यक्तीला घाटीत दाखल करण्यासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने त्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. मनमाड-काचीगुडा रेल्वे सकाळी ७.५७ मिनिटांनी लासूर स्टेशन येथे दोन मिनिटाच्या थांब्यानंतर निघाल्यावर यावेळी थोड्याच अंतरावर असणाऱ्या रेल्वे फाटकादरम्यान या रेल्वेतील एक प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत या प्रवाशाचा डावा पाय घोट्यापासून तुटल्याने तो प्रवासी बेशुद्ध झाला. प्रवाशांनी रेल्वे थांबविल्यानंतर रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेसाठी मदत मागितली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या प्रवाशाला घाटीमध्ये नेण्यात आले. परंतु घाटीच्या डॉक्टरांनी सदर व्यक्तीची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची लोहमार्ग पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार सोनवणे आणि मिलिंद वाघमारे करीत आहेत. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप संतोषकुमार सोमाणी यांनी केला आहे.
डुलकी लागलेल्या रेल्वे प्रवाशाचा मृत्यू
By admin | Updated: June 2, 2015 00:29 IST