जालना : जायकवाडी - जालना योजनेचा पाणीपुरवठा मंगळवारपासून नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या योजनेतून शहरासाठी पाणी घेणे बंद आहे. त्यामुळे शहरात सोमवारी (ता. १०) पर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांनी दिली.जायकवाडी - जालना पाणीपुरवठा योजनेसाठी इंदेवाडी येथील एअरवॉल नादुरूस्त आहे. तसेच तेथील जलकुंभाजवळील बटरप्लायवॉल नवीन बसविण्याचेही काम बाकी आहे. शिवाय एक जलवाहिनीही अंथरली जाणार आहे. देखभाल दुरूस्तीअंतर्गत हे काम आताच करणे आवश्यक आहे. कारण आगामी काळात टंचाई निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात अशा तांत्रिक कामांमध्ये अधिक वेळ जाऊ नये, यासाठी हे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. देखभाल दुरूस्तीच्या कामामुळे मंगळवारपासून जायकवाडी जलाशयातून पाणी घेणे बंद करण्यात आले आहे. दुरूस्तीचे काम तीन दिवस चालणार असून त्यानंतर पाणी घेऊन त्याचा पुरवठा करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सोमवारनंतरच शहरात नियमित पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता आर.यू. बगळे यांनी दिली. दरम्यान, दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून नागरिकांनी ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
आता सोमवारपर्यंत जालन्याचा पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: November 6, 2014 01:34 IST