उस्मानाबाद : न्यायालयीन प्रकरणांची माहिती पक्षकारांच्या आणि सरकारी वकिलांना तात्काळ मिळावी आणि जेणेकरून दोन्ही बाजूंची मंडळी न्यायालयात वेळेवर उपस्थित राहतील, यासाठी आता जिल्हा न्यायालयाने एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्याची माहिती आता संबंधित वकिलांना तात्काळ मिळू शकणार आहे. याशिवाय प्रकरण किती तारखेला सुनावणीसाठी येणार आहे, याचीही याद्वारे मिळू शकणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांच्या हस्ते या सुविधेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे न्यायालयीन कामकाजात आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या जिल्हा न्यायालयात २००६ पासूनची सर्व प्रकरणे संगणकीकृत आहेत. त्यांच्या नोंदी संगणकाद्वारे अद्ययावत केल्या जातात. आता या एसएमएस सुविधेने त्यात आणखी भर पडली आहे. यावेळी जिल्हा न्यायाधीश (वर्ग १) पठाण, मोरे (वरिष्ठ स्तर), जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, बार असो. चे पदाधिकारी एम.एस. घोगरे, ए. टी. कदम, पी. ए. जगदाळे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
न्यायालयीन प्रकरणांची आता माहिती एसएमएसद्वारे
By admin | Updated: July 10, 2014 00:59 IST