जालना : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील सभेत झालेल्या पाणीटंचाई प्रश्नी अनुपालन न दिल्याच्या कारणावरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.३१ जुलै रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने न दिलेल्या अनुपालनाच्या मुद्यावरूनच गोंधळाला सुरूवात झाली. माईक तोडणे, टेबल फेकणे, प्रोसेडिंग बुक हिसकावणे यासारखे प्रकार विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केले. तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या पार्श्वभूमीवर प्रशासन याबाबत काय कारवाई करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. २७ मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते सतीश टोपे यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर कार्यकारी अभियंता तांगडे यांनी उत्तरे दिली. परंतु त्याने विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. या चर्चेसंबंधीचे अनुपालन ३१ जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेच्या प्रोसेडिंग बुकमध्ये येणे अपेक्षित होते. मात्र ते आले नाही. विरोधी सदस्यांनी याच मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. तर सत्ताधारी मंडळींनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यानुसार पाणीटंचाई प्रश्नी अनुपालन का दिले नाही, याचा जाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून विचारण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता तांगडे यांना प्रशासकीय पातळीवर समज देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.३१ जुलै रोजी सभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ आॅगस्टपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा होणार आहे. या सभेला अवकाश असला तरी ग्रामीण भागातील जनतेचे आतापासूनच त्याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासातही हा प्रकार अपवादात्मक घडला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राजकीय पटलावरही या बाबीचे महत्व वाढले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन.तांगडे हे गेल्या एक-दीड महिन्यांपूर्वीच रूजू झाले आहेत. यापूर्वी तीन वर्षांपूर्वीही त्यांनी याच पदावर जालना येथे काम केले होते.
कार्यकारी अभियंत्यांना नोटीस?
By admin | Updated: August 3, 2014 01:14 IST