लातूर : पाणीपुरवठ्यास व्यत्यय आणणाऱ्यांना जरब बसावी म्हणून प्रतिबंधात्मक १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन किंवा दमदाटी करून टँकर आपल्या भागात नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यासाठी हे १४४ कलम लागू केले आहे. पाणी भरण्यासाठी लोक एकत्र जमले तर त्यासाठी हे कलम लागू नाही. परीक्षा केंद्रावर जसे परीक्षेस अडथळा आणल्याविरुद्ध हे कलम लागू होते, मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यास अडथळा होतो, तसे जलकुंभावर पाणी वाटपात अडथळा होत आहे म्हणून हे १४४ कलम लागू होणार आहे. हे कलम पाणी भरण्यास मनाई करीत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिले. सध्या लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी आणले जात आहे. जेथून पाणी आणले जात आहे, तेथील लोकांचाही विरोध होत आहे. शिवाय, पाणी मिळावे म्हणून काही लोक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतात, तर काही जण टँकर आपल्या भागात पळवितात, याला आळा बसावा म्हणून १४४ कलम लागू केले आहे. तो जमावबंदीचा आदेश नाही. १४४ कलमांबाबत झालेल्या संभ्रमाबाबत दुरुस्ती करण्यात आली असून, केवळ पाण्याच्या टाकीवर चढणे आणि टँकर पळविण्याबाबत हे कलम लागू करण्यात आले आहे. शहरातील जे मुख्य सहा टँकर पॉर्इंट आहेत, त्या ठिकाणीच १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सरस्वती कॉलनी येथील जलकुंभ, आर्वी रोड येथील जलकुंभ, गांधी चौक येथील जलकुंभ, नांदेड नाका येथील जलकुंभ, क्वाईल नगर येथील जलकुंभ या ठिकाणी १४४ कलम लागू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जमावबंदी नव्हे; प्रतिबंधात्मक १४४ कलम
By admin | Updated: March 19, 2016 00:55 IST